प्रतिनिधी / लातूर
ठाकरे, पवार हे माफिया सरकार आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रक्रिया सुरू असतांना सत्ताधारी देशमुख कुटूंबियांनी एखाद्या माफियाने बँक हडप करावी अशा पध्दतीने निवडणुक प्रक्रिया राबवुन विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याने या पुर्ण घटनेची चौकशी करावी अशी आपण करणार असून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार साखर कारखानदारी देशमुख कुटूंबीयांनी गिळंकृत केला असल्याचा घणाघात भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर, आमदार तथा जिल्हाध्यक्ष रमेश कराड, आ.अभिमन्यू पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील, जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे आदिसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील कांही दिवसापासून किरीट सोमय्या लातूर दौर्यावर येणार अशी चर्चा होती. या दौर्यात नेमकं कोणता घोटाळा उघडकीस करतील अशी लातूर जिल्ह्यात चर्चा सुरू असतांना काल सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लातूरच्या राजकारणातील देशमुख कुटूंबियांवर थेट आरोप केले. लातूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीबाबतची माहिती मला आज प्राप्त झाली आहे. झालेल्या गैरव्यवहाराबाबतची माहिती घेवून याबाबत निश्चीतपणे चौकशी करून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्रातील साखर कारखानदारीतील घोटाळा यामध्ये लातूर जिल्ह्याचाही समावेश असल्याचे सांगून महाराष्ट्रातील साखर कारखानदारी घोटाळयातील उच्च न्यायालयाने कांही संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील दोन संस्थानाचा समावेश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सहकारी साखर कारखानदारीतील घोटाळ्याबाबत आपण लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सोबत घेवून ईडीकडे तक्रार करणार असून लातूर जिल्ह्यातील या प्रकरणी 31 डिसेंबर अखेर चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रातील साखरदारीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. शेतकर्यांच्या व सर्वसामान्यांच्या मालकीचे साखर कारखाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्या कुटूंबियांशी संबंधीत असलेल्या संस्थांवर धाडी टाकून चौकशी केली असता 1 हजार 50 कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्तेचा ईडीने तपास केला आहे.
या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी ठाकरे, पवार सरकारने समीर वानखेडे नावाचे प्रकरण उकरून काढून त्याचा धर्म काय? त्याची जात काय? त्याचे कितवे लग्न? हिंदु का मुस्लिम? अशी चर्चा घडवून आणुन मुख्य प्रकरणाकडे डायर्व्हट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनीलाँड्रींगच्यामाध्यमातून राज्यातील साखर कारखाने महावसुली आघाडी सरकारने गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालविला असून यात लातूर जिल्ह्यातील देशमुख परिवाराचाही सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी भाजपा नेते आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.रमेश कराड, आ.अभिमन्यु पवार आदिंनी लातूर जिल्ह्यातील सहकारी कारखाने, जिल्हा बँक आदिमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील निवदेनाची प्रत किरीट सोमय्या यांना सुपूर्द केली.
महाराष्ट्र घोटाळमुक्त करणार
आपण आतापर्यंत 24 प्रकरणात घोटाळे उघडकीस आणले आहेत. माझे टार्गेट 40 घोटाळे उघडकीस करण्याचे आहे. मला महाराष्ट्र घोटाळेमुक्त करायचे आहे. राज्यातील 12 कोटी जनतेचे आशिर्वाद मला असल्याने या सर्व संस्थांची चौकशी करून घोटाळेबाजांना जेलमध्ये घालण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.