गांधीवादी मार्गाने 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन करणार
प्रतिनिधी / लातूर
दोन दिवसापुर्वी झालेल्या कॅबीनेटच्या मिटींगमध्ये राज्यातील शेतकर्यांना 365 कोटी रूपयांचे अनुदानापोटी मदत जाहीर करण्यात आली. परंतू लातूर जिल्ह्याला शेतकर्यांच्या मदतीसाठी एक नवा रूपयाही मिळाला नाही. कॅबीनेटच्या मिटींगला लातूरचे पालकमंत्री हजर नव्हते का? तर त्यांनी आवाज का उठवला नाही. अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर इतके असंवेदनशील पालकमंत्री कसे काय? असा प्रश्न उपस्थित करून आघाडी सरकारने लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांची एकप्रकारे क्रुरचेष्टाच केली आहे. असा घणाघाती आरोप माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
सरकारने शेतकर्यांना 72 तासाच्या आत मदतीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आपण लातूर येथील शिवाजी चौकात पक्षातील कार्यकर्त्यांसोबत गांधीवादी मार्गाने 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील 3 लाख शेतकर्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यानंतर झालेल्या अतीवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने त्याचवेळी काही ठिकाणी पंचनामे केले होते. तसेच प्रशासनाला शेतकर्यांना सरसकट अधिकाधिक मदत मिळावी यासाठी आपण पत्रव्यवहार केला होता. काही भागात तर ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीनुसार तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतू शेतकर्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतरच्या काळात लातूर जिल्ह्यातील 10 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करून पालकमंत्री हेच शेतकर्यांना नुकसानीची भरपाई न मिळवून देण्यात जबाबदार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून यापुढेही आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला आहे. विमा कंपनी व सरकारचे साटेलोटे असल्याने विमा कंपनीही मदत करत नाही. उलट विमा कंपनीला ज्या जिल्ह्यातून जास्त नफा होईल त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना अधिकची टक्केवारी विमा कंपनीकडून मिळत असल्याचा आरोपही यावेळी संभाजीराव पाटील यांनी केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देशमुख आदिसह भाजपातील पदाधिकारी उपस्थित होते.
..तर समोरासमोर बसून चर्चा करा
लातूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी केवळ प्रशासन जबाबदार असून याची सर्व जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे. मांजरा धरणातून चुकीच्या पध्दतीने पाणी सोडल्याने जवळपास 15 टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाहून गेले आहे. गृहीत धरण्याची भाषा ही पालकमंत्र्यांना शोभणारी नाही. 10 हजार हेक्टर शेतीच्या नुकसानीची जबाबदारी पालकमंत्र्यांवरच आहे. आपण पालकमंत्र्यांशी या प्रश्नावर समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आवाहन यावेळी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.