प्रतिनिधी / लातूर
अहमदपूर तालुक्यातील उजनी येथील सिध्दी शुगर साखर कारखान्याची 2 कोटी 73 लाख 43 हजार 150 रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेन्नई येथील कंपनीच्या संचालकासह लातूर येथील त्यांच्या प्रतिनिधीवर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसापूर्वी विलास सहकारी साखर कारखान्याची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. विलास सहकारी साखर कारखाना हा पालकमंत्री अमीत देशमुख यांच्या ताब्यात आहे. तर अहमदपूर येथील सिध्दी शुगर कारखाना राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यात आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्री व आमदारांच्याच कारखान्याचीच फसवणूक होत असेल सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेचे रक्षण कसे होणार असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात फसवणूक, लुट-लुटमार, चोर्यांचे प्रमाण, हाणामारी, खुनाचे प्रकार दिवसागणीक वाढत आहेत. लातूर जिल्ह्यात तर अवैद्य धंद्यावर दररोज धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. अशातच दोन साखर कारखान्यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. विलास कारखान्यानंतर सिध्दी शुगर कारखान्यानेही साखरेची परदेशात निर्यात करण्यासाठी चेन्नई येथील कंपनीशी 2607 मेट्रीक टन साखर खरेदी करण्याचा करार केला होता. या कराराप्रमाणे केंद्र सरकारकडे कागदपत्रे जमा करणे व अनुदान मिळणे गरजेचे असतांना तसे न करता साखरेची नियमानुसार निर्यात न करता तीची परस्पर विल्हेवाट लावली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कारखान्याने वारंवार कागदपत्रांची मागणी करूनही साखर कारखान्यास केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान 2 कोटी 72 लाख 43 हजार 150 चे नुकसान करून फिर्यादीची व केंद्र शासनाची फसवणूक करून त्यावर मिळणार्या अनुदानाचा अपहार केला आहे. म्हणून कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण राजाराम पाटील, रा.अहमदपूर यांनी प्रदिपराज चंद्रबाबु, प्रदिप कालादास गायत्री व अभिजीत देशमुख यांच्यावर गुन्हा रजि. 243/221 नुसार कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.