पाकिस्ताविरूद्धच्या 1965, 1971 च्या युद्धात शौर्य
गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
1965 आणि 1971 च्या पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात देशासाठी प्राणांची बाजी लावून लढलेले उचगाव (ता. करवीर) येथील माजी सैनिक लान्स नायक भीमराव दत्तू माने (वय 77) यांचे गुरूवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ‘तरुण भारत’चे पत्रकार संतोष माने यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन आज शुक्रवारी (दि. 8) सकाळी 8 वाजता उचगाव येथील स्मशानभूमीत आहे.
मानेअण्णा म्हणून उचगाव परिसरात प्रसिद्ध असणाऱया भीमराव माने यांनी पाकिस्तानविरूद्धच्या दोन्ही युद्धात 16 मराठा इन्फ्रट्री बटालियनच्या माध्यमातून आपल्या शौर्याचे दर्शन घडविले होते. 1971 चे युध्द जिंकताना भारताने पाकिस्तानमधून बांगलादेशाची निर्मितीही केली होती. या दोन्ही युद्धांतील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे वर्णन माने नेहमी करत असत. करारी बाणा, धाडसी असणारे माने कडक शिस्तीचे होते. लान्स नायकपदावरून भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एसटी महामंडळात सेवा बजावली. गावातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असे. ग्रामपंचायत व विविध संस्थांच्या 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या ध्वजारोहनला सोहळय़ाला ते न चुकता उपस्थित राहत असत. त्यांच्या निधनाने देशसेवा बजावलेला सच्चा सैनिक आणि उचगाव परिसरातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.