ऑनलाईन टीम / रांची :
बिहारमध्ये शनिवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडत आहे. त्यातच आरजेडीचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या रांची मधील जेलमध्येच राहावे लागणार आहे. चारा घोटाळा प्रकरणातील दुमका कोषागार प्रकरणाच्या जामीन अर्जावर शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सुट्ट्यांमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्यांच्या याचिकेवर 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत लालू प्रसाद यादव यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरणात चार वेगवेगळ्या केसमध्ये आरोपी आहेत. त्यातील 3 प्रकरणात त्यांना जमीन मिळाला आहे. त्यामुळे दूमका प्रकरणात त्यांना जमीन मिळाला असता तर आज त्यांची जेलमधून सुटका झाली असती, मात्र, सुनावणीची तारीख पुढे गेल्याने लालू प्रसाद यादव यांचा मुक्काम रांचीतील तुरुंगातच असणार आहे.
सप्टेंबर 2013 मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादवांना अटक झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र नंतर पुन्हा 23 डिसेंबर 2017 मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांनी जामीन याचिका दाखल केली आहे.