आता वकिलांचा युक्तिवाद : निकालाकडे लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज लावण्यात आला आहे. या ध्वजामुळे तिरंगा ध्वजाचा अवमान होत आहे. तेव्हा तो हटवावा, या मागणीसाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन केले होते. त्या खटल्याची सुनावणी पाचवे कनि÷ दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. त्या ठिकाणी साक्षीदारांच्या साक्ष पूर्ण झाल्या आहेत.
धर्मवीर संभाजी चौक येथे म. ए. समितीचे मनोज पावशे, सूरज कणबरकर, अजित कोकणे, सुधीर कालकुंद्रीकर, नारायण किटवाडकर, सतीश गावडोजी यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करत या सर्वांवर कॅम्प पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. बुधवारी काही जणांच्या साक्षी होत्या. त्यांनी आपल्या साक्षी नोंदविल्या आहेत. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने
ऍड. महेश बिर्जे यांनी साक्षीदारांना चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यामुळे साक्षीदारांनी आम्हाला काय माहीतच नाही, असे सांगून तेथून काढता पाय घेतला आहे. नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास वकिलांनी आणून दिले आहे. आता साक्ष पूर्ण झाली असून या खटल्यामध्ये सरकारी वकील आणि कार्यकर्त्यांचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
या लाल-पिवळय़ा ध्वजाविरोधात तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडेदेखील तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून तिरंग्याचा अवमान होत असून त्याबाबत योग्य ते पाऊल उचलावे, अशी सूचना केली होती. मात्र अजूनही तो ध्वज हटविण्यात आला नाही. उलट मराठी भाषिकांनाच नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर आणि ऍड. रिचमॅन रिकी हे काम पाहत आहेत.