जिल्हाधिकाऱयांना युवा म. ए. समितीने दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
लाल-पिवळय़ा ध्वजाबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन महापालिकेच्या समोर अनधिकृत उभे केलेला लाल-पिवळा हटवावा. अन्यथा महापालिकेवर भगवा फडकविला जाईल, असा इशारा पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे.
तिरंगा ध्वजाचा अवमान करण्याचा प्रकार घडला असतानादेखील जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. केंद्र सरकारनेही याबाबत निर्णय घेऊन तातडीने लाल-पिवळा ध्वज हटविण्यास राज्य सरकारला सूचना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अनधिकृतरीत्या बेकायदेशीर असलेला लाल-पिवळा ध्वज उभा करताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजासमोर हा ध्वज उभा करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होत असून यामध्ये संपूर्ण देशाचाच अवमान झाला आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.
कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबत यापूर्वीच तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्यास तो गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी प्रादेशिक आयुक्त कार्यालय, रेल्वे स्टेशनसमोरही हा बेकायदेशीर ध्वज उभा करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजाशिवाय कोणत्याही ध्वजाला उभा करणे हा गुन्हा आहे. तेव्हा त्यानुसार कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, आर. आय. पाटील, मदन बामणे, श्रीकांत कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.