बुधवारी घेणार जिल्हाधिकाऱयांची भेट : त्यानंतर मोर्चाचे नियोजन
प्रतिनिधी / बेळगाव
काही मुठभर कन्नड संघटनांचे कार्यकर्ते शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेसमोर बेकायदेशीररीत्या लाल-पिवळा ध्वज उभे करण्यात आला आहे. तो ध्वज हटविण्याचे आश्वासन आतापर्यंत देण्यात आले आहे. मात्र, अजूनही तो ध्वज हटविण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्येक चौकात आणि गल्लीमध्ये भगवा ध्वज लावून महाराष्ट्राचा जयजयकार केला जाईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. याचबरोबर याबाबत बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
17 जानेवारी हुतात्मा दिन अत्यंत गांभीर्याने पाळण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानंतर या बैठकीत लाल-पिवळय़ा ध्वजाबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत मराठी भाषिकांनी ठोस निर्णय घ्यावा, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या. त्यानुसार आता जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यानंतर ठराविक वेळ दिला जाणार आहे. त्या वेळेत जर तो ध्वज हटविला नाही तर तातडीने भव्य मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
याचबरोबर शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये भगवा ध्वज उभा करण्यात येणार असून जर लाल-पिवळा हटवत नसाल तर आमच्या भगव्यालाही हात लावायचा तुम्हाला अधिकार नाही. जर कोणीही याबाबत हात लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सडेतोड उत्तरे देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या बैठकीला मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, एल. आय. पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, बी. एस. पाटील, संभाजी देसाई, अजित पाटील, कृष्णकांत बिर्जे, राजाराम गावडे, बी. डी. मोहनगेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत झालेल्या देसूर येथील जोतिबा आप्पय्या पाटील, येळ्ळूरचे जवान जोतिबा मनोहर पाटील, दत्तात्रय म्हात्रू पाटील, एम. एस. पाटील, रामभाऊ साताप्पा पाटील, पांडुरंग देवाप्पा उसुलकर, यशवंतराव देसाई, गंगाराम आजगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.