पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
लाल-पिवळय़ा ध्वजाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना सूचना करण्यात आली आहे. या प्रकाराला अधिक महत्त्व न देता इतर गोष्टींकडे लक्ष द्या, असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांना सांगितले. यामुळे कन्नड माध्यमाच्या प्रतिनिधींना आणि पत्रकारांना एकप्रकारे घरचा अहेरच मिळाला आहे.
कायदा व सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडू नये यासाठी लाल-पिवळय़ा ध्वजाबाबत योग्य आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. 374 ग्राम पंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत लक्ष्मी हेब्बाळकर आपली सत्ता असल्याचे सांगत आहेत, असे पत्रकारांनी छेडले असता त्यांना तो भ्रम झाला आहे. मी याबाबत लवकरच सर्व नूतन ग्राम पंचायत सदस्यांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बागेवाडी, अंकलगी अशा काही मोजक्मयाच ग्राम पंचायतींवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत. मात्र इतर ठिकाणी सर्वत्र भाजप आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गोकाक फॉल्स सौंदर्यीकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत आराखडा तयार करून पाठविण्यात आला. त्याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच हे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोविड लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वांना मोफत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांनी सर्वात जास्त ग्रामीण मतदार संघाबाबतच अधिक उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेमध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना लक्ष्य बनविण्यात आल्याचे दिसून आले.