पशूसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांची माहिती : जनावरांमध्ये रोग आढळल्यास तातडीने उपचाराची व्यवस्था
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात लाळय़ा खुरकत रोग नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहे. बेंगळूर ग्रामीण, रामनगर, चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ांमध्ये लाळय़ा खुरकत नियंत्रणासाठी जनावरांना लसी दिल्या जात आहेत. खासगी लस उत्पादन कंपन्यांकडूनही औषधे खरेदी करण्यात येत आहेत, अशी माहिती पशूसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी लाळय़ा खुरकत लसीकरण अभियान सुरू आरोप केला होता. त्यामुळे मंत्री प्रभू चौहान यांनी रविवारी पत्रक प्रसिद्ध करून वरील स्पष्टीकरण दिले आहे. लाळय़ा खुरकतबाबत पशूसंगोपन खात्यातील अधिकाऱयांशी गांभीर्याने चर्चा केली आहे. जनावरांमध्ये लाळय़ा खुरकत आढळून आल्यास जिल्हय़ातील खासगी केंदांकडून लस खरेदी करून जनावरांचे आरोग्यहित जोपासण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या राज्यात कोठेही लाळय़ा खुरकतमुळे जनावरांचा मृत्यू झालेला नाही. रोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर जनावरांवर तातडीने उपचार केले जात आहेत. त्यामुळे लाळय़ा खुरकत नियंत्रणात आहे. चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात 2,100, आनेकल तालुक्यात 1,450 आणि रामनगर जिल्हय़ात 70 जनावरांना लस देण्यात आली आहे. रामनगरमध्ये 5 जनावरांमध्ये लाळय़ा खुरकत आढळून आला होता. त्यापैकी 4 जनावरांचे आरोग्य स्थिर आहे. तर एका जनावरावर उपचार सुरू आहेत. कोणत्याही जिल्हय़ामध्ये या रोगामुळे जनावर दगावल्याची नोंद झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण अभियान राबविण्यात आले होते. 2013 पासून दरवर्षी लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकार 60ः40 या प्रमाणात लसीकरण अभियान राबविते. मागील वर्षापासून हे अभियान पूर्णपणे केंद्र सरकार राबवत आहे. कोरोना परिस्थितीमुळे यादा लसीकरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यास विलंब झाला आहे, अशी माहितीही मंत्री प्रभू चौहान यांनी दिली.
जुलैपासून सामूहिक लसीकरण अभियान
लसीकरण अभियानाबाबत केंद्रातील अधिकाऱयांशी चर्चा करण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून राज्यात जनावरांसाठी सामूहिक लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण अभियान सुरू करण्यात येईल. सध्या लाळय़ा खुरकत आढळून येणाऱया जनावरांवर स्थानिक पातळीवर संबंधित जिल्हय़ांमध्ये लस खरेदी करून उपचार केले जात आहेत. जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी जलदगतीने उपचाराची कार्यवाही केली जात आहे, असा पुनरुच्चार प्रभू चौहान यांनी केला आहे.