काही काळ गोंधळाचे वातावरण, जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
हिजाबवरून वाद उफाळत असल्याने सदाशिवनगरातील विजया पॅरामेडिकल कॉलेजला सक्तीची सुटी देण्यात आली आहे. दरम्यान आरएलएस-लिंगराज कॉलेजमध्ये शमलेला वाद सोमवारी पुन्हा उफाळून आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी निवेदन न स्वीकारताच विद्यार्थिनींची बोळवण केली.
मागील बुधवारपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. पहिल्याच दिवशी आरएलएस- लिंगराजमध्ये सात विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून प्रवेश केला. त्यांनी वर्गात देखील हिजाब काढून ठेवण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर विजया पॅरामेडिकल कॉलेजमध्ये सलग तीन दिवस हिजाबवरून वाद झाल्याने परीक्षा रद्द करून कॉलेजला सुटी देण्यात आली होती.
सोमवारी पुन्हा लिंगराज कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्याने वादाला तोंड फुटले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही विद्यार्थिनी हिजाब घालून आवारात प्रवेश करीत होत्या. त्यांना अडविण्यास जिल्हाधिकाऱयांनी मनाई केली असली तरी सदर विद्यार्थिनींनी वर्गातही हिजाब परिधान करूनच बसण्याची परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. पण जिल्हाधिकाऱयांनी निवेदन स्वीकारले नाही.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांना हिजाबसह केवळ आवारात प्रवेश द्यावा. वर्गात बसण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना महाविद्यालय प्रशासनाला केली.
परीक्षा असूनही अरेरावी
सोमवारपासून अकरावी आणि बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत. हिजाब प्रकरणावरून परीक्षा चुकविल्यास पुन्हा संधी दिली जाणार नाही. असा सज्जड इशारा पदवीपूर्व शिक्षण खात्याने दिला आहे. तरीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना भडकावण्याचा प्रयत्न सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे काही प्राध्यापकांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सर्व शाळा, महाविद्यालयांसमोर कडक पोलीस बंदोबस्त होता.
‘त्या’ कॉलेजबद्दल निर्णय नाही
विजया पॅरामेडिकल कॉलेजला जिल्हाधिकाऱयांनी सक्तीची सुटी दिली आहे. हिजाबवाद मिटेपर्यंत कॉलेजला सुटी असेल. विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह कपडे परिधान करून केवळ महाविद्यालय आवारात प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. पण त्याचा गैरफायदा घेतला जात असून, अन्य काही कॉलेजमध्येही त्याचाच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न झाला. या घटना दुर्दैवी आहेत, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.