डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजींचा खुलासा
प्रतिनिधी/बेळगाव
विश्वगुरु बसवेश्वरांचे कार्यक्षेत्र असलेल्या बसव कल्याणमध्ये ‘अनुभव मंडपा’ची उभारणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालना देण्यात आली आहे. ही गोष्ट आनंददायी असली तरी या निमित्ताने राज्यातील वेगवेगळय़ा दैनिकांत दिलेल्या जाहिरातीत गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आले आहेत, असे गदग येथील तोंटदार्य मठाचे डॉ. सिद्धराम स्वामीजींनी म्हटले आहे.
यासंबंधी गुरुवारी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातीत ‘सनातन पुरोगामी विचारांची पुनउ&भारणी’ असे वाक्मय आहे. यातच मुळात दोष आहे. सनातन आणि पुरोगामी विचार यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? ते दोघे एकत्र राहू शकत नाहीत. सरकारने त्यांना एकत्र करण्याचा चमत्कार केला आहे, असे स्वामीजींनी म्हटले आहे.
सनातन आणि पुरोगामी हे दोन शब्द एकत्र येवू शकतात. ही दोन्ही विचारधारा एकत्र येवू शकत नाहीत. बाराव्या शतकात सनातन वर्णव्यवस्था, जातीभेद, लिंगभेद या विरोधात पुरोगामी विचारांच्या लिंगायत धर्माची स्थापना झाली. पुरोगामी विचारांचे महात्मा बसवेश्वरांना सनातन धर्माचे पुरस्कर्ते असल्याचे भासविण्यात आले आहे.
बसवतत्त्वाला हरताळ फासण्याचे हे काम आहे. स्वतंत्र लिंगायत धर्माचे अस्तित्व नाकारण्याबरोबरच लिंगायतही हिंदू आहेत, हे दर्शविण्याचे काम सरकारने करून दाखविले आहे. लिंगायत धर्म पुरोगामी विचारांचा धर्म आहे. अनुभव मंडपात पुरोगामी विचारांवरच चर्चा घडत होती. नव्याने उभारण्यात येणाऱया अनुभव मंडपातही पुरोगामी विचारांचे मंथन व्हावे. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेदाचे पुरस्कार करणाऱया विचारांचे पुनर्निर्मिती होवू नये, अशी अपेक्षाही स्वामीजींनी व्यक्त केली आहे.