युवकावर चाकूने वार करुन त्याच्याकडील ऐवज लांबवला
प्रतिनिधी/ सातारा
परळी भागात एखाद्या नागरिकास रात्री उशीरा जायचे असेल तर बोगद्यातून पालिकडे गेल्यानंतर अडवून लुटण्याचे प्रकार वाढु लागले आहेत. त्याचाच प्रत्यय शनिवार पेठेतल्या 21 वर्षीय युवकास आला. त्याला लिफ्टच्या बहाण्याने ऐश्वर्यानगरीजवळ थांबवत त्याच्या मानेवर, छातीवर चाकूने वार करुन त्याच्याकडील ऐवज चोरटा घेऊन गेला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या परिसरात वाहनधारकांनी रात्रीच्या सुमारास अडवून लुटणारी टोळीच कार्यरत झाली असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे.
परळीसह आसनगाव, कुमठे, शिवाजीनगर, कुसावडे, परमाळे, ठोसेघर या भागात जाणारे नागरिक हे प्रामुख्याने बोगद्या मार्गेच प्रवास करतात. परंतु रात्रीच्यावेळी जर एखाद्याला चुकून आपल्या गावाला जायचे असेल तर बोगद्यातून पुढे गेल्यावर रस्त्यात अडवून लुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत. रस्त्यात काहीतरी वस्तू टाकन किंवा गाडीला हात दाखवून गाडी थांबवली जाते. त्यांचा साथीदार दुसऱया बाजूला थांबलेला असतो. अन् लुटालुटीचे प्रकार घडू लागले असल्याने भितीचे वातावरण आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात श्रीतेज लक्ष्मण पवार (रा. शनिवार पेठ सातारा) हा त्याच्याकडील वाहनाने जकातवाडीकडे दि. 11 रोजी रात्री 8.30 वाजता निघाला होता. तेव्हा त्यास अनोळखी व्यक्तीने हात केला. हात केल्याने पवार याने गाडी थांबवली. गाडी थांबवताच त्या व्यक्तीने पवाराच्या मानेवर, छातीवर चाकूने वार करुन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. व पवारला तु आरडाओरडा केलास आणि कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी देत, शिवीगाळ करत त्याच्या खिशातून 900 रुपये काढून घेवून गेला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे हे करत आहेत.