गेले सव्वा वर्ष कोरोनाच्या उदेकामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे. अभ्यास आणि शिक्षण केवळ ऑनलाईन होत आहे. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची लिहायची सवय सुटल्याचा विदारक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढला गेला आहे. वर्षभर सातत्याने ऑनलाईन अभ्यास केल्याने वहीवर ‘लाईन’ काढायची सवयही सुटली असल्याचे दिसून येत आहे. कित्येक बाल विद्यार्थ्यांची लिखित अक्षरओळखही पुसली गेली असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे शरीर प्रकृतीच्या नाशाबरोबरच या बौद्धिक संकटालाही विद्यार्थीवर्गाला तोंड द्यावे लागत आहे.
शाळेत शिक्षक शिकवत असताना ज्याप्रमाणे चित्त शिकविण्याकडे एकाग्र होऊ शकते किंवा ते एकाग्र करण्याची सक्ती होऊ शकते, तसे ऑनलाईन शिक्षणात होत नाही. शाळेत शिकविण्याकडे लक्ष नसेल तर शिक्षक ते वेधून घेतात. वेळप्रसंगी शिक्षाही करतात. त्यामुळे अभ्यास आवडत असो वा नसो चित्त विचलित होऊ देण्याची सोय नसते. तथापि, ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणारे कोणीच नसल्याने अनेकांना लक्ष केंद्रीत करण्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत. तसेच एखाद्या मुद्दा समजला नसल्यास शिक्षकाला तो पुन्हा विचारण्याची सोय असते. तसे ऑनलाईन शिक्षणात काही करता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन करण्यासही समस्या निर्माण होत असल्याचे भीषण वास्तव सध्या समोर येत आहे.
समुपदेशनातून तोडग्याचा प्रयत्न
काही शहरांमध्ये अशा अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन हा प्रभावी उपाय असल्याचे दिसून येत आहे. अनेक अनुभवी शिक्षक सध्या समुपदेशनाचे कार्य करीत आहेत. परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्याला करून देऊन ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादांची त्याला कल्पना देणे आणि त्यातूनही शिकणे कसे आवश्यक आहे? यासाठी त्याची मानसिकता तयार करणे, हे कार्य केले जात आहे.