तृणमुल काँग्रेस देणार महत्वाची जबाबदारी
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते आत्ता तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करीत. त्यानतंर त्यांना पश्चिम बंगाल मधून राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. लुईझिन फालेरो यांना केंद्रात नेऊन त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्याची तयारी तृणमूल काँग्रेसने आखली आहे.
गेले दोन दिवस लुईझिन फालेरो यांनी नावेली मतदारसंघातील आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्या घरी बोलावून आपण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची कल्पना दिली. आपण पक्ष का सोडतोय हे देखील त्यांनी स्पष्ट केले. आपण गेली 40 वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत राहिलो. मात्र, आज भाजप सरकारच्या राजवटीत सर्व सामान्य लोकांना आपले जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. भाजपला टक्कर देण्यासाठी आज कुणी तरी पुढे यायला पाहिजे आणि हे काम केवळ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करू शकतात, त्यांच्यात धमक असून त्यांनी बंगालच्या निवडणुकीत भाजपला धुळ चारली होती. आज अशा नेतृत्वाची देशाला गरज आहे. म्हणूनच आपण तृणमुल काँग्रेस मध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी आपल्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना सांगितले.
आपण गेले 20-25 दिवस चिंतन, मनन करत होतो. आपली तपश्चर्या सुरू होती. तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय आपण पूर्ण विचाराअंती घेतला आहे. आज एकूणच परिस्थिती खुपच वाईट आहे. भाजप सरकारने कितीही दावे केले तरी सर्व सामान्य जनतेला त्रासातून दिवस काढावे लागतात. देशाचा विकास रखडला आहे. देशाला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर न्यायचे झाल्यास खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि हे नेतृत्व केवळ ममता बॅनर्जी यांच्याच कडे असल्याचे त्यांनी आपल्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला.
नावेलीतील जनतेने आपल्यावर खुप प्रेम केले आहे. त्यांना अंधारात ठेवून आपल्याला कोणताच निर्णय घ्यायचा नव्हता, म्हणूनच आपण गेले दोन दिवस सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना फोन करून घरी बोलावले व त्यांच्याशी संवाद साधल्याचे लुईझिन फालेरो यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
केंद्रात महत्वाची जबाबदारी
लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे चार काँग्रेस पक्ष एकत्रित करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्याच बरोबर लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. खुद्द लुईझिन फालेरो यांनी तसे विधान काल आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करताना केले आहे.
श्री. फालेरो यांच्याकडे यापूर्वी श्रीमती सोनिया गांधी यांनी महत्वाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना गोव्यात पाठविण्यात आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे 17 आमदार असताना देखील पक्षाच्या गोवा प्रभारी यांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना पत्र सादर करण्यास परवानगी दिली नाही आणि त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या व भाजपचे सरकार सत्तेवर आले. याचा देखील उल्लेख लुईझिन फालेरो यांनी केला आहे.