प्रतिनिधी/ पणजी
साहित्य माणसाला विचार करण्याची शक्ती देते, साहित्यामुळे चांगला नागरिक घडतो म्हणून प्रत्येकाने साहित्य लेखन करणे फार महत्वाचे आहे. प्रत्येकाने आपले अनुभव साहित्यातून मांडावे केवळ पुरस्कार मिळावे किंवा प्रसिद्धी मिळावी म्हणून नव्हे तर आपले सत्य अनुभव साहित्यात उतरावे. लेखक प्रत्येकात असतो तो व्यक्त होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन समाजसेविका सुलक्षणा सावंत यांनी केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझाने आयोजित केलेल्या बहुभाषिक महिला साहित्य मेळावा 2022 कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात सुलक्षणा सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध लेखिका प्रा. विजयाताई मारुलकर, इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझाचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर, कला सांस्कृतिक संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब, सदस्य कालिक बापट, उज्वला तारकर, डॉ. आशा गेहलोत, ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
नियमित डायरी लिहिणे ही लेखनाची सुरुवात आहे. ती सवय आपण जोपासली पाहिजे. आपण लिहिलेली डायरी कालांतराने वाचली की आपल्या स्वभावात झालेला बदल जाणवतो. आपण जे साहित्य लिहितो ते कुणाला आवडेल की नाही, कुणी छापणार की नाही याचा विचार करू नये. नियमित लिहित राहावे. कालांतराने आपल्यातील लेखक सुधारतो आणि चांगल्या साहित्याची निर्मिती होते. तेच साहित्य आपल्याला उंच शिखरावर नेते, असे सुलक्षणा सावंत पुढे म्हणाल्या.
प्रा. विजयाताई मारुलकर म्हणाल्या की, साहित्य हा संस्कृतीचा वारसा आहे. तो एका पिढी पासून दुसऱया पिढीपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. आज जर आपण साहित्याची निर्मिती केली नाही तर पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत. मागील काळात जे काही घडले, ज्या काही समस्या होत्या, त्या काळातील महिलांच्या मनाची व्यथा काय होती ती आपल्याला आज साहित्याच्या माध्यमातून कळते. आज काळ बदलेला आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात काम करीत आहेत. तरी सुद्धा समस्या, व्यथा या आहेत. कदाचित त्या वेगळ्य़ा असतील. पण त्या पुढच्या पिढीसाठी साहित्यात मांडून ठेवणे महत्वाचे आहे, असे मारुलकर म्हणाल्या. यावेळी प्रा. मारुलकर यांनी आपण लिहिलेली तीन पुस्तके इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेझीज ब्रागांझाला दिली आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. गोरख मांद्रेकर यांनी स्वगतपर भाषण केले तर डॉ. आशा गेहलोत यांनी प्रस्तवीकपर भाषण केले. यावेळी डॉ. किरण बुडकूले, जयश्री रॉय हरमलकर, नुतन साखरदांडे व मिना समुद्र यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. किरण बुडकूले म्हणाल्या की, इन्स्टिटय़ुट ऑफ मिनेझिस ब्रागांझा ही संस्था खूप जुनी असून तीला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्था विविध कार्यक्रम राबवीत असून अनेक कलाकांरांना व्यसपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत. या संस्थेकडून आमचा जो सत्कार झाला त्यामुळे आपण संस्थेचे आभारी आहोत. आपण हा सत्कार सर्व साहित्यीकांच्या वतीने स्विकारत आहे. हा सत्कार म्हणजे माझ्या जीवनातील अभिमानाचे प्रतीक आहे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर शेवटी अशोक परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱया सत्रात उज्वला कामत तारकर यांनी एक पात्री नाटक सादर केले. तिसऱया सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुमेधा कामत देसाई यांची कालिका बापट यांनी मुलाखत घेतली. तसेच आम्ही अभिव्यक्त का होता या विषयावर पेपर सादरीकरण झाले. यात सुनेत्रा जोग, डॉ. जयंती नायक, स्मिता दारशेतकर, प्रा. पौर्णिमा केरकर व डॉ. नुतन देव यांनी विचार मांडले.