प्रा. माधुरी शानभाग : शारदोत्सव सोसायटी आयोजित ‘सृजन लेखन कार्यशाळे’मध्ये मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
लेखन कलेच्या प्रवासात अथक कष्ट हे अपरिहार्य आहेत. त्याला कोणताही पर्याय नाही. एका अर्थाने लेखकाचा प्रवास हा कामगार, कारागीर, कलावंत व प्रतिभावंत अशा टप्प्याने असतो. लेखन सुरू करताना तो शब्दाशी झटापट करतो. पुढे हे शब्द फुलविण्यासाठी कारागिरी करतो आणि त्यातून एक चांगला विचार देऊन तो कलावंत किंवा प्रतिभावंत होतो, असे विचार लेखिका व शारदोत्सव सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांनी व्यक्त केले.
शारदोत्सव सोसायटी आयोजित ‘सृजन लेखन कार्यशाळे’मध्ये कथा व ललित लेखन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, 64 कलांपैकी सृजन लेखन ही एक कला आहे. मात्र ती शिकवून फारशी येत नाही. तर त्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र प्रवास करावा लागतो. तीन प्रकारचे लेखन असू शकते. त्यापैकी शब्दांकन, वार्तांकन, अहवाल हे दुसऱयांची मते नीट लिहिणे असते. वार्तांकनासाठी शब्दांवर हुकुमत हवी आणि ते सुसंगतपणे लिहायला हवे. मात्र तेथे सृजनाचा फारसा उपयोग होत नाही.
‘अर्थ सृजन लेखन’ म्हणजे अनुवाद, प्रासंगिक, चरित्र लेखन, प्रवास वर्णन, पुस्तक परिचय, माध्यमांतर संवाद, पटकथा यांचे लेखन होय. यासाठी सराव अतिशय महत्त्वाचा आहे. शब्द सामर्थ्य, कल्पना विकास आणि कल्पना फुलविणे या तिन्हींचा संगम झाल्यास सृजनशील होऊ शकते. अनुवादासाठी दोन भाषांवर प्रभुत्व हवे. प्रासंगिक लेखनासाठी घटना व प्रसंग यांचे आकलन हवे. चरित्र लेखन हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा धांडोळा असतो. प्रवास वर्णनात कल्पना विलासाला वाव असतो. मात्र पूर्ण सृजनशील लेखनमध्ये कथा, कादंबरी, कथिका, नाटक, ललित लेख यांचा समावेश येतो.
लेखनासाठी शब्दसंग्रह वाढवायला हवा, शब्द छटांचे आकलन हवे, त्यासाठी कोडी सोडविणे उपयुक्त ठरते. वैविध्य आणि वैचित्र्य आणून कल्पनेचे वारुळ उधळू दिल्यास कल्पना विस्तार जमतो. मात्र हे सर्व करताना माणूस, नातेसंबंध, विचारांचे आदानप्रदान महत्त्वाचे मानायला हवेत. कोणतीही कथा प्रवाही असावी. त्यामध्ये व्यक्तीविचार असावा. भावनिक आवाहन, मूल्य विवेक आणि शेवटी लेखकाचे स्वतःचे भाष्य हवे, असे सांगून लेखन हे आराखडा, सुरुवात, वाक्मयरचना, नर्मविनोद आणि समारोप या क्रमाने यावे, असे माधुरी शानभाग म्हणाल्या.