फेरमूल्यांकनानंतर 350 जण उत्तीर्ण : शिवाजी विद्यापीठाने तांत्रिक दोष केला दुरूस्त
संजीव खाडे / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या विधि शाखेच्या अंतिम वर्षातील लेबर लॉ विषयाच्या पेपरमध्ये नापास झालेले तब्बल 350 विद्यार्थी फेरमूल्यांकनात पास झाले आहेत. मार्चमध्ये या पेपरची परीक्षा ऑनलाईन झाली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी नापास झाल्याचे स्पष्ट झाले होते. विधि विद्यार्थी कृती समितीने निकालावर आक्षेप घेत फेरमूल्यांकनाची मागणी केली होती. सॉफ्टवेअरचे पुर्ननिरीक्षण करत त्यातील दोष दुरूस्त करून नव्याने पेपर तपासण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे शिवाजी विद्यापीठाने विधि शाखेचे अर्थात लॉच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. शेवटच्या वर्षातील पहिल्या सेमिस्टरमधील सिव्हिल प्रोसिजर कोड अँड लिमिटेशन अॅक्ट, लॉ ऑफ इव्हिडन्स, लेबर लॉ, लँड लॉ, ड्राफ्टिंग अँड टेडिंग कॉन्व्हर्सी या विषयांचे पेपर झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या उत्तरार्धात जाहीर झाला. पाच पेपर पैकी लेबर लॉच्या पेपरमध्ये तब्बल साडेतीनशे विद्यार्थी नापास झाल्याचे उघड झाले. विधि शाखेच्या अंतिम वर्षातील पेपरमध्ये पास होण्यासाठी किमान 50 टक्के गुण मिळवावे लागतात. लेबर लॉच्या पेपरमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 44 आणि 48 असे गुण मिळाल्याची माहिती पुढे आली. त्यातून फेरमूल्यांकनाची मागणी विद्यार्थ्यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या लॉच्या बोर्ड ऑफ स्टडिजचे (विधि अभ्यास मंडळ) चेअरमन प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे यांच्याकडे या प्रकाराच्या पुर्ननिरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या तांत्रिक दोषाची तपासणी केली. त्यानुसार दुरूस्ती करून पेपरचे फेरमूल्यांकन केले. त्यामध्ये तांत्रिक दोषाचा परिणाम लेबर लॉच्या पेपरच्या निकालावर झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या निकालावर तांत्रिक दोषाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर निकालाबाबत जागृत असणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया विधि शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी प्रदीप माकणे यांनी दिली.
ऑनलाईन परीक्षेत कधी कधी तांत्रिक दोष निर्माण होऊ शकतो. लेबर लॉच्या पेपरच्या परीक्षेत सॉफ्टवेअरमध्ये झालेले दोष दुरूस्त करून पेपरचे फेरमूल्यांकन केले. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली.
– प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे
‘तरुण भारत'ने मांडली होती विद्यार्थ्यांची व्यथा 'लेबर लॉच्या पेपरमध्ये 350 विद्यार्थी नापास' या शीर्षकाखाली तरुण भारतने 23 मे च्या अंकात बातमी प्रसिद्ध करून विधि विभागाच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडलीं होती. तरुण भारतमुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनानंतर लागलेल्या निकालावर दिली.