विशेष प्रतिनिधी/ देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील हातीव रेशन दुकान चालकाने लाभार्थ्याच्या रेशन कार्डवर खाडाखोड करून त्यांना धान्यापासून वंचीत ठेवल्याचा प्रकार लॉक डाउन काळात उघड झाला आहे. याविरोधात भाजप महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ रश्मी कदम यांनी ऑनलाईन पोर्टल आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी होउनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मौजे हातीव येथे मुरादपुर, हातीव आणि निवे या गावांसाठीचे संयुक्त रेशन दुकान आहे. या दुकानावर 700 पेक्षा अधिक लाभार्थी अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत 2014 पासून लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. यात केशरी कार्ड धारकांमधील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नियमानुसार धान्य मिळणे गरजेचे होते. मात्र गेली 6 वर्षे यातील जवळपास 272 लाभार्थ्यांना धान्य मिळत नव्हते.
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने सरसकट सगळयांना धान्य देण्याचे जाहिर केले आणि या 272 जणांना धान्य न मिळाल्याने त्यांनी रश्मी कदम यांच्याकडे धाव घेतली. यानंतर शासनाच्या टोल फ्ढ्रि क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली असता संबंधीतांची कार्ड या योजनेला पात्र असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कदम यांनी आपलं सरकार या पार्टलवर ऑनलाइन तक्रार केली त्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन सादर केले. सदर तक्रारीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेउन प्रशासनाने मंडल अधिकारी यांना चौकशीसाठी पाचारण केले. यात धान्य न मिळालेल्या लाभार्थ्यांसमोर रेशन दुकान चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या गोष्टीची पंचयादी घालण्यात आली असून प्रशासन त्या दुकानदारावर काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान केवळ हातीवच नव्हे तर तालुक्यातील अन्य कोणत्याही गावात रेशन दुकानांबाबत असा प्रकार होत असेल तर ग्रामस्थांनी विनासंकोच आपल्याशी संपर्क साधावा त्यांना न्याय देण्यात येईल असे रश्मी कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.