वृत्तसंसथा/रांची
टाळेबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या झारखंडच्या 180 श्रमिकांची 2 स्वप्ने गुरुवारी पूर्ण झाली आहेत. या संकटकाळात ते स्वतःच्या घरी पोहोचले, तसेच जीवनात पहिल्यांदाच त्यांना विमानप्रवासाची संधी मिळाली आहे. या श्रमिकांकडे गावी परतण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळविण्याचेही पैसे नव्हते. तसेच पायी परतण्याचे त्राण नव्हते. अशा स्थितीत नॅशनल लॉ स्कुल, बेंगळूरच्या माजी विद्यार्थ्यांनी या श्रमिकांचा विमानप्रवासाचा खर्च करून रांची येथे पोहोचविले आहे. विमानतळावर उतरताच या सर्वांनी भूमीला नमन करत उपजीविकेसाठी कधीच राज्याबाहेर जाणार नसल्याचे उद्गार काढले आहेत.
आयआयटी मुंबईनजीक श्रमिक अडकून पडल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना विमानाने त्यांच्या राज्यात पाठविण्याची योजना आखून रक्कम जमविली. काही स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांनी तिकीट आरक्षणात मदत केल्याची माहिती माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे. श्रमिकांना मदत करणारे माजी विद्यार्थी 2000-2001 च्या तुकडीचे आहेत. स्वतःचे नाव प्रसिद्ध होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.
स्वतःच्या भूमीत आलोय..
जीवनात पहिल्यांदाच विमानप्रवास केला आहे. आता स्वतःच्या भूमीत आल्याने आनंदी आहे, मुंबईत परतणार नाही, राज्यातच काहीतरी काम करणार असल्याची प्रतिक्रिया एका श्रमिकाने दिली आहे. टाळेबंदीत घरी परतण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. रेल्वे किंवा अन्य वाहनाचे प्रवासभाडे देण्यासाठी पैसे नव्हते. परंतु या अवघड काळात हवाईप्रवासाची संधी मिळाल्याने चकीतच झाल्याचे अन्य एका श्रमिकाने म्हटले आहे.
टाळेबंदीत काम बंद झाले आणि घरातून बाहेर पडणे थांबले. सूतगिरणीच्या मालकाने वेतनच दिले नाही. मुंबईत जेवणाची व्यवस्था करणे अवघड ठरले होते. परंतु काही जणांच्या दातृत्वामुळे विमानप्रवासाची संधी मिळाली. भविष्यात मुंबईत कधीच जाणार नसल्याचे उद्गार हजारीबागचे रहिवासी विनोंद डांगी यांनी काढले आहेत.