भाजीपाल्याची मागणी मंदावल्याने समस्या
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले आहेत. याचबरोबर बळीराजालाही त्याचा फटका बसू लागला आहे. सध्या बळीराजा लॉकडाऊन काळातही शेतामध्ये काम करत आहे. मात्र, भाजीपाला व इतर उत्पादित केलेला माल बाजारपेठेत आणणे अवघड झाले आहे. यामुळे शहरापासून लांब असलेल्या गावांतील शेतकऱयांना लॉकडाऊनचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. शेतकऱयांमुळे देशातील प्रत्येकाला अन्न मिळते. मात्र या अन्नदात्याकडेच आजपर्यंत शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशा कठीण काळातही बळीराजा मात्र शेताकडे जाऊन आपली कामे करताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे त्याने उत्पादित केलेला माल मात्र विक्री करणे कठीण झाले आहे. मिरचीचे उत्पादन यावर्षी चार पटीने निघत आहे. पण खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱयांना शेतातच हे पीक कुजवून टाकावे लागत आहे. कारण पोलीस बाजारपेठेला माल आणण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे घाबरून बळीराजा शहराकडे फिरेनासा झाला आहे.
सरकारने शेतकऱयांसाठी काही मुभा दिल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. शेतकरी भाजीपाला विकत असताना काही पोलीस त्यांचा तो भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत. अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी ग्रामीण भागात थांबून त्या ठिकाणी भाजी विक्री करत आहेत. मात्र दर नसल्यामुळे शेतकऱयांना फटका बसू लागला आहे. गोवा व महाराष्ट्र राज्यात जाणारा भाजीपालाही कमी झाला आहे. कारण खरेदीदारच नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱयांनाच अधिक फटका सहन करावा लागत आहे. तेव्हा सरकारने शेतकऱयांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.