वार्ताहर / सांगरूळ
कोरोना संसर्गाच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात आणि राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर) येथे राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनची जिल्ह्यात चर्चा झाली होती. यावर पत्रकार राजाराम लोंढे यांनी लिहिलेल्या ‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चपासून दिल्लीपासून आलेल्या आदेशांचे गल्लीपर्यंत अगदी तंतोतंत पालन करण्यात आले. यावेळी गावागावांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले. मात्र सांगरूळ गावाने घेतलेली दक्षता, शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता राबवलेली यंत्रणेचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. हा पॅटर्न कसा राबला, त्याची संकल्पना काय होती, यामध्ये सर्व राजकीय मतभेद विसरून गाव कसे एकसंध झाले, साडे तीन महिने कोरोनाची महामारी गावाच्या वेशीबाहेर कशी रोखली. हे सगळे ‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ पुस्तक रूपाने सांगरुळचे सुपुत्र पत्रकार राजाराम लोंढे यांनी मांडले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, ॲड. सुरेश कुराडे, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक, डी जी खाडे, सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, सुभाष सातपुते, अर्चना खाडे, व्ही. के. नाळे आदी उपस्थित होते.