प्रतिनिधी/ बेळगाव
नाभिक समाज संभ्रमात अडकला आहे. सरकार कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. काहीजण दुकान उघडत आहेत, तर काहीजण भीतीने अजूनही दुकान सुरू करण्याचे टाळत आहेत. हा समाज अत्यंत गरीब आहे. तेव्हा सरकारने या समाजाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. इतरांप्रमाणे आम्हालाही मदत करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा हडपद नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने आमच्या व्यवसायाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. दुकान उघडायचे की बंद करायचे हेच समजणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने याबाबत खुलासा करावा. लॉकडाऊनचे सर्व नियम आम्ही पाळू, मात्र आम्हाला इतरांप्रमाणे सुविधा पुरवाव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोरोना हा अत्यंत घातक आजार आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्हीदेखील हा व्यवसाय करण्यास तयार नाही. जोपर्यंत पूर्णपणे या आजारावर मात केली जात नाही, तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नियम पाळू. मात्र सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. हाताच्या पोटावर आम्ही आजपर्यंत जगत आलो आहे.
अचानक गेल्या 43 दिवसांपासून आमचा व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे आम्हाला जीवन जगणे अवघड झाले आहे. आम्हालादेखील सरकारने विमा द्यावा, याचबरोबर व्यवसाय बंद झाल्यामुळे उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तूंबरोबर आर्थिक मदतही करावी. तेव्हा त्याचा सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने मदत करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी हडपद समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश हडपद यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.