प्रतिनिधी/बेळगाव
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बेंगळूर व पुणे या शहरांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. परंतु या काळातही प्रवाशांना विमानाचा आधार आहे. त्यामुळे दररोज प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून सुरक्षित प्रवास म्हणून विमानप्रवासाला पसंती दिली जात आहे.
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. बेळगावमधून अहमदाबाद व बेंगळूर या दोन शहरांना पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली. त्यानंतर हैद्राबाद, म्हैसूर, मुंबई, पुणे, इंदूर, अजमेर या शहरांना विमानसेवा पूर्ववत करण्यात आली. देशातील विमान प्रवाशांमध्ये कमालीची घट झालेली असतानाही बेळगावमधील विमानप्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
बेंगळूर व पुणे या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांसमोर प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु विमान व रेल्वे प्रवसाला यामधून वगळण्यात आले आहे. नागरिकांना विमानाचे तिकीट दाखवून विमानतळापर्यंतचा प्रवास करता येणार आहे. यामुळे या लॉकडाऊनच्या काळातही विमानप्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज अलायन्स एअरचे विमान पुणे तर इंडिगो व स्टार एअर बेंगळूर शहराला सेवा देत आहेत.
विमानाचा प्रवास सुरक्षित
विमानाचा प्रवास हा सर्वात सुरक्षित म्हणून प्रवाशांची पहिली पसंती विमानाला असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव विमानतळावर सुरक्षिततेच्या सर्व त्या खबरदाऱया घेतल्या जात आहेत. येणाऱया-जाणाऱया प्रवाशांची तपासणी, सॅनिटायझेशन, फेस शिल्ड या सर्वांचा वापर केला जात आहे. आलेल्या प्रवाशांची माहिती आरोग्य विभाग व मनपाला दिली जात आहे. सर्व त्या खबरदारी घेत असल्यामुळे विमान प्रवास करणाऱयांची संख्या वाढती आहे.