वार्ताहर/ राजापूर
राजापूरातील बंगलवाडीत जाधव कुटुंबीयांनी लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र मेहनत घेत सुमारे 55 फूट खोल विहीर खोदत वेळेचा सदुपयोग करतानाच एकजूटीचे आदर्शवत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. जाधव कुटुंबातील 15 माणसानी 32 दिवसात हा पराक्रम केला असून दरवर्षी भेडसावणाऱया पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी इलाज केला आहे. दरम्यान सामाजिक कार्येकर्ते विवेक (पिंटय़ा) गुरव, यशवंत गुरव, अजित गुरव यांनी जाधव कुटुंबीयांची भेट देऊन त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल कौतुकाची थाप दिली आहे.
राजापूर शहरातील बंगलवाडी येथील जाधव बंधूंचे सुमारे 45 ते 50 सदस्यांचे कुटुंब आहे. पारंपारिक शेतीसोबतच अन्य लहान-मोठे व्यवसाय करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने सर्व कुटुंबीय घरातच होते. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतानाच दरवर्षी भेडसावणाऱया पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी आपल्याच घरपरसात विहीर खोदण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यासाठी किती अंतरावर पाणी आहे याचा पडताळा घेऊन विहीर खोदण्यास सुरूवात केली.
सुमारे 40 हातावर पाणी लागेल म्हणजे जवळजवळ 60 फूट विहीर खोदावी लागेल असा अंदाज धरून जाधव कुटंबातील तरूण आणि पुरूष मंडळी कामाला लागली. सकाळी सात ते रात्री दहा असा कामाचा नित्यक्रम ठरवून त्यांनी विहीर खोदाई सुरू केली. दिवसाला साधारण चार ते पाच फूट खोदाई करत असताना एक महीन्याच्या कालावधीत 55 फूटांपर्यंत खोदाई केली आहे. या ठिकाणी पाणी लागल्याने जाधव कुटुंबाच्या कष्टाचे सार्थक झाले आहे आणि पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.
विहीर खोदत असताना आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात केली आहे. माती उपसण्यासाठी कोणत्याही यंत्राची मदत न घेता पारंपारीक साधनांनाच त्यांनी वापर केला. शिडी आणि दोरखंडाच्या सहाय्याने विहीरीत उतरून माती आणि दगड विहीरीबाहेर काढले. यामध्ये बाळकृष्ण जाधव, गणेश उर्फ बाळू जाधव, यज्ञेश धुरी, शशिकांत शिंदे, परेश जाधव, प्रसाद जाधव, विश्वनाथ ननावरे, सतिश जाधव, महेंद्र जाधव, किसन जाधव, अजिंक्य जाधव, भगवान धुरी, सुनिल तांबे, संजय करंजे, कुणाल तांबे, अजिंक्य जाधव आदींसह भवानीप्रसाद मित्रमंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.