प्रतिनिधी / कोल्हापूर
शासनाच्या मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याचा निर्णयामुळे मालवाहतूक वाहने, उद्योगधंदे सुरु होत असल्याने जिल्हय़ांतर्गत हालचाली वाढणार आहेत. मालवाहतूक वाहनांतून प्रवासी वाहतूक करू नये. असा प्रकार आढळल्यास त्या वाहनाचा वाहतूक परवाना जप्त केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. अर्थचक्र सुरू होणाऱया या हालचालीमुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तीव्र करा, असे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि प्रभारी अधिकाऱयांशी जिल्हाधिकाऱयांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यात सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, लॉकडाऊन काळात सर्वांनी चांगलं काम केलं आहे. सद्यस्थिती केंद्र, राज्य शासनाने काही प्रमाणात मर्यादा उठवल्याने अर्थव्यवस्था सुरू झाली आहे. मालवाहतूक वाहनामध्ये चालक आणि अन्य देघे अशा तिघांनाच परवानगी दिली आहे. किमान 1 हजार वाहने जिल्हय़ातून ही मुंबई, पुणे आदी संसर्गित गावात जातात. त्यामुळे या वाहनामध्ये दोन व्यक्ती असल्या तरी त्यांचा किमान पाच ते दहा जणांशी संपर्क येऊ शकतो. एक वाहनामुळे 20 जणांचा संपर्क येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजे 20 हजार जणांचा संपर्क होऊन वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱया वाहनांच्या चालक, वाहकांनी प्रथम स्वतःची काळजी घ्यावी. या वाहनांतून प्रवासी वाहतूक कटाक्षाने टाळावी, पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवावे. प्रवासी वाहतूक निदर्शनास आल्यास संबंधिताचा मालवाहतूक परवाना रद्द करून वाहन जप्त करावे.
तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी करा
जिल्हय़ातील 19 तपासणी नाक्यांवर मालवाहतूक वाहनांमध्ये तिघेच असावेत. मास्क, सॅनिटायझरची सक्ती हवी. वाहतूकदार संघटनेला दक्षतेबाबत सूचना द्याव्या. प्रभाग समिती, स्वयंसेवकांच्या मदतीने सीमाबंदी कडक करा. झोपडपट्टी परिसरात कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्या. डबलसीट प्रवास करणाऱयांवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले.
कोल्हापूर शहरात संचारबंदी कठोर करावी
महापालिका, नगर पालिका क्षेत्रात प्रभागनिहाय हालचाल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करा. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त प्रभाग सोडून जाऊ नये. शहरात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करावी. नागरिकांनी काही दिवस संयम ठेवावा व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील झोपडपट्टींवर लक्ष केंद्रीत करा ः डॉ. कलशेट्टी
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शहरातील झोनबंदी यशस्वी करूया. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भाजी खरेदी-विक्री करा. शहरातील 44 झोपडपट्टय़ांवर लक्ष केंद्रीत करा. संभाव्य धोका ओळखून नियोजन करण्याची सुचना त्यांनी केली.
पेट्रोलिंगवर भर द्या ः पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, पास असलेल्या वैद्यकीय, शासकीय अधिकारी, मालवाहतूक वाहनांना तपासणी नाक्यावरून प्रवेश देण्यात येत आहे. ट्रकचालकासह अन्य दोघांची नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे वैद्यकीय तपासणी करा. झोपडपट्टीत पेट्रोलिंगवर भर द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागात रस्ते खोदून प्रवेशबंदी नको ः अमन मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, काही गावांमध्ये रस्ते खोदून चरीद्वारे कायमस्वरूपी प्रवेशबंदी सुरू आहे. अशा ठिकाणी रूग्णवाहिकेसाठी अडचणी येत आहे. गावबंदी करताना अत्यावश्यक सेवेचा विचार करा, शहरांत सीसीटिव्हीचा प्रभावी वापर करून दंडात्मक कारवाई करा. ड्रोनचाही वापर करावा. सामाजिक अंतर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वॉरंटाइनची प्रभावी अंमलबजावणी केल्यास कोरोना प्रतिबंध शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.