मालवाहू गाडय़ा पूर्वीप्रमाणेच सुरू
प्रतिनिधी / मडगाव
‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या विचारात रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेसह भारतीय रेल्वेवरील सर्व प्रवासी रेल्वे सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मेल / एक्स्प्रेस (प्रीमियम टेनसह) आणि प्रवासी गाडय़ा 03 मे 2020 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
देशाच्या विविध भागात आवश्यक वस्तूंची पूर्तता करण्यासाठी, रो-रो, वस्तू आणि पार्सल गाडय़ा पूर्वी प्रमाणेच सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
पुढील सल्ल्यापर्यंत ई-तिकिटांसह कोणत्याही प्रकारच्या तिकिटांचे बुकिंग केले जाणार नाही. तथापि, तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. पुढील आदेश येईपर्यंत यूटीएस आणि पीआरएस तिकिट बुकिंगचे सर्व काउंटर बंद राहतील.
रद्द झालेल्या गाडय़ांच्या बुकिंगच्या तिकिटांसाठी पूर्ण परतावा देण्यात येईल. 3 मे 2020 पर्यंत रद्द केलेल्या गाडय़ांसाठी परतावा स्वयंचलितपणे ग्राहकांना ऑनलाइन पाठविण्यात येणार आहेत. काउंटरवर बुक केलेले तिकिटे 31 जुलै 2020 पर्यंत परत येऊन तिकिटांचे पैसे परत मिळवू शकता, असे रेल्वेच्या सूत्रांनी कळविले आहे.