काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल, प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन पुरेसा उपाय नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 3 मेपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र केवळ लॉकडाऊन करून कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणते धोरण राबविणार आहे, असा सवाल मंगळवारी काँगेसच्या वतीने करण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊनचा निर्णय पुरेसा नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. देशात आरोग्य आणीबाणी असताना विरोधी पक्षांचा सरकारने सल्ला घेण्यास सरकारला कोणती समस्या आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत होती. तरीही केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करून 12 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली. याचा लाभ लाभार्थींना का दिला नाही, असेही सवाल त्यांनी केले. देशातील काही भागात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र सरकार यावर कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाची किंमत कमी झाल्याचा लाभ शेतकरी, वाहतूकदार आणि मध्यम वर्गाला मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.