प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरासह जिल्हय़ात पुकारण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जे घरी आहेत, ते आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर एकत्रित आहेत. मात्र जे विविध कारणांमुळे शहरात अडकून पडले आहेत, अशा परगावाच्या नागरिकांसह फिरस्त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहेत, अशाही व्यक्तींना जेवण दुर्लभ झाले आहे. या सर्वांसाठी हिंदूत्ववादी कार्यकर्ते संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील सेवाव्रत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावून आले आहेत. त्यांनी गेली तीन चार दिवस अन्न वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे.
लॉकडाऊनमध्ये शहरात अडकून पडलेल्या नागरिकांसह गोरगरीब आणि फिरस्त्यांना अन्न मिळत नसल्याचे समजल्यानंतर सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अन्न वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेली तीन चार दिवस दररोज दोनशे लोकांना पुरेल इतके अन्न वाटप केले जात आहे. सेवाव्रत प्रतिष्ठानच्या रूग्णवाहिकेतून शहरातील प्रत्येक भागात जाऊन गरूजू नागरिकांन अन्न दिले जाते. भात आणि बटाटा रस्सम असा मेनू असतो. त्याचबरोबर पाण्याची बाटलीही दिली जाते. बाबुजमाल दर्गा परीसर, ताराबाई रोड गंगावेश, रेल्वेस्टेशन रोड, मध्यवर्ती बस स्थानक, आझाद चौक आदी परीसरातील गरजू नागरीकांना अन्न वाटप केल्याची माहिती बंडा साळुंखे यांनी दिली. या कार्यात दीपक सपाटे यांची मदत महत्वाची ठरत आहे. पतित पावन संघटनेचे सुनील पाटील, नेशन फर्स्ट युथ ऑगनायझेशनचे अवधूत भाटे यांच्यासह पतीत पावन संघटनेचे सुनील पाटील,युथ आर्गनायझनचे अवधुत भाटे, मोहन देवाळकर, आकाश हुंसाळे, सचिन अस्तीग्ध, नितेश कोकीतकर, केदार मोरे आदी कार्यकर्ते या लाखमेलाच्या कार्यात सहभागी आहेत.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये मुक्या जनावरांना चारा
पहिल्या लॉकडाऊनमध्ये बंडा साळुंखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील भटक्या गायी, म्हशी, वासरांना चारा देण्याचे कार्य केले होते. ग्रामीण भागातून चारा आणून तो मुक्या जनावरांना वाटला जात होता.