प्रतिनिधी / सातारा
सातारकर नागरिक आजपर्यंत अत्यंत धीराने आणि संयमाने उपचार नसलेल्या कोरोना या आजाराला सामोरे गेले आहेत. अनेक कुटुंबातील प्रत्येक जण त्यांची होणारी गैरसोय स्विकारून कोरोनाचा प्रतिकार करीत आहे किंबहुना या महाभयंकर संकटाचा सामना करण्यास लागणारे धारिष्टय आजपर्यंत सातारकरांनी आपल्या कृतीमधुन आणि जिद्दीमधून दाखवून दिले आहे. परंतु नागरीकांची गैरसोय कमी व्हावी म्हणून प्रशासनाने दिलेल्या लॉकडाऊनमधील सवलतींचा सातरकरांनी फायदा जरूर घ्यावा परंतु गैरफायदा घेवून, स्वत:बरोबरच संपूर्ण सातारकरांना धोका निर्माण होईल असे वर्तन मुळीच करू नये असे कळकळीचे विनम्र आवाहन सातारच्या नगराध्यक्षा कदम यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे सर्व सातारकांराना केले आहे.
गेल्या 50 दिवसांपासून जागतिक महामारी असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा सातारकर सामना करीत आहेत. लागण झालेल्या काही जणांशी अतीसंपर्क झाल्यामुळे साताऱ्यातही कोरोना रूग्णांची वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. भरीसभर म्हणून शासन यंत्रणेकडून परराज्यात आणि परजिल्हयात अडकलेल्या व्यक्तींना सातारा जिल्हयात येण्यास व साताऱ्यातुन परराज्यात जाण्यास रितसर परवाने दिले जात असल्याने, आता सातारकरांच्या जबाबदारीत अधिकच वाढ होणार आहे.
लॉकडाऊनमधील सवलत अत्यावश्यक कामा करिताच आहे, अतिआवश्यक काम असेल तरच नागरिकांनी घरातुन बाहेर पडावे. कोरोना संपला अशा अविर्भावात नागरीक जर रस्त्यावर यायला लागले तर त्यामधुन मोठा संसर्ग होण्याची फार मोठी भीती आहे. नागरीक जर असेच वागायला लागले तर आणि दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच प्रशासन अधिक कडक पावले उचलेल आणि त्यामुळे मग अनेकांना फार मोठया समस्यांचा सामना करावा लागेल या जाणिवेतुन सातारकर नागरिकांनी जसा आत्तापर्यंत संयम दाखवला त्याहुन अधिक संयमाने लॉकडाऊनमधील सवलतींचा लाभ घ्यावा.
इतिहासात सातारकरांचे स्थान फार मोठे आहे, त्यामुळे आपल्या त्यागाच्या, निष्ठेच्या इतिहासात सातारकर नागरिक अद्यापी उपचार नसलेल्या महामारी कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यास प्रशासनास, नगरपालिकेस सहकार्य करतील आणि जरूर ती काळजी घेतील असा ठाम विश्वास देखिल याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी संजोग कदम यांनी यावेळी व्यक्त केला.