साडे पाच महिन्यांनंतर जनजीवन येणार पूर्वपदावर
प्रतिनिधी/ सातारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनापासून राज्यातील निर्बंध कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कोरोना संसर्गाबाबत तिसऱया टप्प्यात असणाऱया सातारा जिल्हय़ातील निर्बंध उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. 15 ऑगस्टपासून बाजारपेठा रात्री दहापर्यंत खुल्या राहणार असून हॉटेल, मॉल, बार, उपहारगृहेही रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंदिरे, चित्रपटगृहे बंदच राहणार असून विवाह सोहळय़ांना जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. दुसरी लाट कायम असताना संसर्ग न वाढू देण्याची खबरदारी जिल्हावासियांना घ्यावी लागणार आहे.
जिल्हय़ात दुसऱया लाटेचे रूग्ण वाढू लागल्यानंतर 2 मार्चपासून जिल्हय़ात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर हे निर्बंध कमीअधिक होत गेले. आता स्वातंत्र्यदिनापासून पुन्हा जिल्हा खुला होणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत.
उपहारगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल. आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱयांसह सर्व कर्मचाऱयांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल. ज्या कर्मचाऱयांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे, असेच कर्मचारी काम करू शकतील. सर्व दिवस रात्री 10.00 वाजेपर्यंत हॉटेल, उपहारगृहे सुरू ठेवण्यास देण्यात येत आहे. पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
दुकाने, शॉपिंग मॉलही पूर्ण वेळ सुरू होणार
जिल्हय़ातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस, शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱया सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱयांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक राहिल.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा
वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना
सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱयांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱयांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. शासकीय- निमशासकीय कार्यालये नियमित वेळेत पुर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच खासगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.
विवाह सोहळे शंभर ते दोनशेच्या उपस्थितीत
विवाह सोहळा आयोजन करण्यासाठी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱया विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱयांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
मंदिरे, सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स बंदच राहणार
जिल्हय़ात सिनेमागृह, नाटय़गृह, मल्टिप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. तर सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक, धार्मिक सेवा करण्यास मुभा राहील.
आंतरराज्य प्रवास
ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे, त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्हय़ात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल. गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रीडा स्पर्धा यावरील निर्बंध कायम राहतील.
अंत्यविधी 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यविधी व दशक्रिया विधी जास्तीत जास्त 50 नातेवाईक/नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल.