राजापुरात 446 कामे, 6 हजार 526 मनुष्यदिन निर्मिती
वार्ताहर/ राजापूर
लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झालेले असताना केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकारची सुमारे 446 कामे करण्यात आली असून त्यातून 6 हजार 526 दिवसांची मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. शिवाय 15 लाख 70 हजार 106 रूपये खर्चही झाले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये झालेल्या आर्थिक कोंडीत ग्रामीण भागातील मजूरांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यातून त्यांचे अर्थाजन व्हावे, या दृष्टीने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मंजुरीसाठी नोंदणी करून जॉबकार्ड घेणाऱया व्यक्तीला नियमित रोजगार देण्याचे उद्दीष्ट आहे. ‘मागेल त्याच्या हाताला काम’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही योजना राबवली जाते. गटविकास अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये पंचायत समितीतर्गंत ग्रामपंचायत, कृषी विभाग यांच्यामार्फत ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यासाठी ग्रामसेवकांसह कृषी अधिकारी सुशांत एकल, विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, सुहास पंडित, सुर्वे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांनी मेहनत घेतली.
लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह साऱयांचीच आर्थिक कोंडी हाताला काम नसल्याने दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून आणि जगायचे कसा, असा प्रश्न साऱयांसमोर आ वासून उभा ठाकला होता. सर्वसामान्यांची ही आर्थिक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत कामे करण्यास मंजुरी दिली होती. त्यातून लॉकडाऊनच्या काळामध्ये तालुक्यात फळबाग लागवड, विहीर, नॅडेप गांडूळ खत, कंपोस्ट खत, शोषखड्डे खोदणे आदी विविध प्रकारची सुमारे 446 कामे करण्यात आली. त्यामुळे 6526 दिवसांची मनुष्यदिन निर्मिती झाली आणि 15 लाख 70 हजार 106 रूपये खर्चही झाले. लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगाराअभावी आर्थिक कोंडी झालेली असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेने ग्रामीण भागातील लोकांना हात देताना उपलब्ध करून दिलेला रोजगार दिलासा देणारा आहे.