पोलीस नाकाबंदी,महसूलच्या ‘गस्ती’वर प्रश्नचिन्ह
रत्नागिरी / प्रतिनिधी
जिह्याच्या सीमा बंद, वाहनांच्या अवैध हालचालीला प्रतिबंध असा सरकारी अधिकारी गाजावाजा करत असताना व्यवहारात मात्र यापेक्षा उलट परिस्थिती †िदसून येत आहे. राजापूर तालुक्यातील वाटूळ परिसरात असलेल्या खाण उद्योगातून एक-दोन नव्हे तर तब्बल दहाहून अधिक ट्रक खनिज रायगड जिह्यातील वडखळ, येथील जेएसडब्ल्यू प्रकल्पामध्ये पोच झाल्याचे पुढे आले आहे.
वाटूळ परिसरात असलेल्या खाणींमधून गारगोटी प्रकारचा दगड औद्योगिक उत्पादनांसाठी वापरला जातो. येथे नियमितपणे उत्पादन सुरु असून त्याचा लाभ औद्योगिक क्षेत्राला होत असतो. कोरोना टाळेबंदीमुळे येथील काम बंद झाले होते. 20 एप्रिलनंतर त्यात सुट देण्यात आली. यानंतर हळूहळू माल वाहतुकीची वाहने रस्त्यावर धावू लागली. परंतु त्यापूर्वीच म्हणजे प्रतिबंधित काळात येथील एका उद्योगाने आपले उत्पादन कारखान्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती उघड झाली आहे.
येथील खनिजाचे उत्पादन केल्यानंतर ते ट्रकमध्ये भरून कारखान्याकडे रवाना करण्यात येते. ही माल वाहतूक मालवाहू ट्रकने करण्यात येते. 17 एप्रिलनंतर 18 एप्रिलपर्यंतच्या काळात 10 ट्रकहून अधिक खनिज काढून ते वडखळ येथील जेएसडब्ल्यू स्टील प्लान्टला पोहोचवण्यात आले. आश्चर्य म्हणजे लांजा, हातखंबा, चिपळूण, संगमेश्वर, भरणेनाका शिवाय कशेडी अशा अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून रस्त्यावर लक्ष ठेवून होती. महसूल खात्याचे कर्मचारी त्यांना मदत करत होते. असे असताना एखाद तब्बल 10 ट्रक खनिज रस्ते वाहतुकीद्वारे अन्यत्र गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही वाहतूक कोणाच्या ‘मार्गदर्शना’खाली झाली याची चर्चाही आता रंगू लागली आहे.
विचारणा होणार
या संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी मीनाक्षी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, प्रत्येक खाण व्यावसायिक आमच्याकडे त्याच्या कामाचा अहवाल सादर करत असतो. यामध्ये कोणत्याही खाण मालकाकडून कोरोना निर्बंधांचा भंग झाला असेल तर आम्ही त्याबद्दल निश्चितपणे विचारणा करू.