एप्रिलमध्ये 22 हजार 250 प्रवाशांचा बेळगावातून प्रवास
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक थंडावली. बस बंद ठेवण्यात आल्या तर रेल्वेलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परंतु या काळातही विमानसेवेची दमदार कामगिरी झाली आहे. एप्रिल महिन्यात 22 हजार 250 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केला आहे. एकीकडे दुसऱया विमानतळांवरील सेवा बंद असताना बेळगाव विमानतळाने उत्तम सेवा बजावली आहे.
कोरोनाचा फटका वाहतूक क्षेत्राला बसला आहे. यामुळे बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मर्यादित स्वरुपात रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु या काळातही बेळगावमधून दररोज 18 ते 20 विमानांची ये-जा सुरू आहे. देशातील प्रमुख शहरांना बेळगावमधून सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे. यामुळेच एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असतानाही बेळगावमधून 22 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. याचे कौतुक थेट एअरपोर्ट ऍथॉरिटीनेही केले आहे.
बेळगाव विमानतळावर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याने प्रवासासाठी एक उत्तम विमानतळ असल्याची प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत. शेजारील इतर विमानतळांपेक्षा बेळगाव विमानतळाला पहिली पसंती दिली जात आहे. आलेल्या प्रवाशांना कुठेही त्रास होणार नाही, याची खबरदारी विमानतळ प्रशासनाकडून घेतली जात आहे.
रविवारी 507 प्रवाशांचा प्रवास
बेळगावमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने मध्यंतरी प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली होती. त्यावेळी विमान कंपन्यांनी प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही दिवसांसाठी सेवा बंद ठेवल्या होत्या. परंतु आता पुन्हा एकदा प्रवासी संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात एकूण 18 विमानांची ये-जा होती तर 507 प्रवाशांनी विमान प्रवास केला. मुंबई, हैदराबाद, बेंगळूर, जोधपूर, इंदूर, तिरुपती, कडप्पा या शहरांना विमानसेवा सुरू होती.