बरे होवून दोन महिने झाले तरी रूग्णांना नातेवाईकांची प्रतिक्षा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वाढत्या कोरोमुळे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत, यातच आता प्रादेशिक मनोरूग्णालयातील बरे झालेले 60 रूग्ण नातेवाईक न्यायला येत नसल्याने अडकून राहिले आहेत. लॉकडाऊन असल्याकारणाने नातेवाईकांना रूग्णांना नेता येत नसून यासंदर्भात प्रादेशिक रूग्णालयासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनोरूग्णालयात ठराविक कालावधीत उपचार घेतल्यावर मनोरूग्ण पूर्णपणे बरे होवून घरी परततात मात्र सध्या लॉकडाऊनमुळे बरे झाल्यानंतरच रूग्णांना घरी जाता येत नाही आहे. रूग्ण बरे झाल्यानंतर घरी परतला तर नातेवाईकांच्या सान्निध्यात त्याच्यात आणखीन चांगले परिवर्तन होवू शकते. मनोरूग्णालयात मुळात रूग्ण अधिक असून या कोरोना काळात सोशल डिस्टस्टींगचीही अंमलबजावणी करताना मनोरूग्णालयासमोर अडचणी येत आहेत तरीदेखील ही अंमलबजावणी काटेकोरपणे पाळली जात आहे. बरे झालेल्या रूग्णांना नातेवाईकांनी प्रशासनाची परवानगी काढून नेले पाहिजे मात्र यामध्ये तसे होत नाही आहे काही नातेवाईक स्वत:हून यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही आहे.
रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालयात बहुतांश रूग्ण हे सांगली, सातारा, कोल्हापूर येथील आहेत. आता बरे झालेल्या रूग्णांमध्ये सांगलीचे 21, सिंधुदूर्गचे 11, कोल्हापूरचे 15, रत्नागिरीचे 11, सातारा 1 आणि सोलापूर 1 असे एकूण 60 रूग्ण आहेत.
मात्र लॉकडाऊनमुळे सध्या हे 60 रूग्ण आपण कधी घरी जाणार असा प्रश्न वारंवार आता कर्मचाऱयांना विचारत आहेत. त्यामुळे आता प्रादेशिक मनोरूग्णालय यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे रूग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून राहिले आहे.