कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागातून 13 रेल्वे : 20 दिवसांत एकूण 68 हजार 759 कामगार रवाना : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात : जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक : पावसाळय़ाच्या तोंडावर आवश्यक खतांचा पुरवठा
दिगंबर वालावलकर / कणकवली:
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात वाहतुकीचे सर्वच मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक मजूर, कामगार अडकून पडले होते. या सर्वांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली ती कोकण रेल्वेने. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची पार्सल ट्रेनच्या माध्यमातून वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कोकण रेल्वेने गेल्या 20 दिवसांत 51 श्रमिक टेनच्या माध्यमातून एकूण 68 हजार 759 कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या वीस दिवसात कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र झोनमधून सिंधुदुर्गनगरी, रत्नागिरी व चिपळूणमधून 13 रेल्वे गाडय़ांच्या माध्यमातून 15 हजार 677 कामगार व त्यांच्या कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचविण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडय़ांची वाहतूक सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत निर्माण होणारी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तुंची टंचाई टाळण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. यानंतर पावसाळय़ाच्या तोंडावर आवश्यक असणाऱया खताचा पुरवठा या तिन्ही राज्यांच्या विविध भागांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱयांना वेळेत खत पुरवठा करणे सोपे जाणार आहे.
चिंतेत सापडलेल्या श्रमिकांना दिलासा!
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात लॉकडाऊनपासून विविध राज्यांतील हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छुक होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास रेल्वे सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या 13 श्रमिक स्पेशल रेल्वेमधून 15 हजार 677 श्रमिक आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या मूळ गावाच्या दिशेने मार्गस्थ झाले. लॉकडाऊनमुळे चिंतेत असलेल्या या श्रमिकांना यामुळे कोकण रेल्वेकडून मोठा दिलासा मिळाला.
अशा राज्यनिहाय श्रमिक मार्गस्थ!
रत्नागिरी, सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन रेल्वेमधून 4016, बिहारला दोन रेल्वेंमधून 2643, तर कर्नाटकमध्ये तीन रेल्वेंच्या माध्यमातून 3680, झारखंड येथे तीन रेल्वे गाडय़ांनी 3501, मध्यप्रदेशला एका रेल्वेतून 1164 व राजस्थानला एका रेल्वेने 673 कामगार मार्गस्थ झाले. आपल्या मूळ गावी जाण्यास मिळाल्याचा मोठा आनंद या श्रमिकांच्या चेहऱयावर दिसत होता. अनेक श्रमिकांनी या निर्णयाचे रेल्वे सिंधुदुर्गातील स्टेशनवरून सुटल्यावर टाळ्य़ा वाजवून स्वागतही केले होते.
गोवा व कर्नाटकमधूनही रेल्वे!
गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतूनही कोकण रेल्वेच्या माध्यमातून श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देशाच्या विविध भागात पोहोचविण्यात आले. गोव्यातून 36 रेल्वेंच्या माध्यमातून 50 हजार 518 श्रमिकांना त्यांच्या मूळ घरी पाठविण्यात आले. कर्नाटकमधून दोन रेल्वेंच्या माध्यमातून 2564 श्रमिक व त्यांच्या कुटुंबियांना गावी पाठविण्यात आले.
अधिकाऱयांची जीवापाड मेहनत!
कोकण रेल्वेच्या मार्गावर श्रमिक रेल्वे आजही त्या-त्या भागातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी धावत आहेत. पुढील काही दिवसांत मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वे यापुढेही कार्यरत राहणार आहे. गेल्या वीस दिवसांत या हजारो कामगारांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांपासून कामगारांपर्यंत सर्वांनीच जीवापाड मेहनत घेतली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महसूल पोलीस आणि एसटी विभागातील कर्मचाऱयांच्या मदतीने हजारो कामगार आपापल्या गावी पोहोचले, त्यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.
प्रशासनाचे समन्वयाने काम!
आपल्या मूळ गावातून येथे कामासाठी आलेल्या कामगारांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत आणणे व यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यापर्यंतची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत होती. या कामगारांना रेल्वेत बसविण्यापासून ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंतची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय करणे यात कोकण रेल्वे व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समन्वय राखत उत्कृष्ट काम केले.