गरीब-गरजु सह सर्वसामान्यांनी घेतला आस्वाद
गौरी आवळे/ सातारा
कोरोनाच्या महामारीत गरीब-गरजुसह सर्वसामान्यांचे हाल झाले. पुरेसे अन्न मिळत नसल्याने अनेकांची उपासमार सुरू होती. ती उपासमार थांबवण्यासाठी शिवभोजन थाळी ही आधार बनली. लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यात आला. गत वर्षी 26 जानेवारी ते 31 डिसेंबर अखेर जिह्यात 5 लाख 56 हजार 900 थाळ्या वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
गत वर्षीच्या 26 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली. कष्टकरी वर्गाला 10 रूपयांत जेवण मिळावे हाच या योजने मागील उद्देश होता. याच थाळीचा आस्वाद गरीब-गरजुसह सर्वसामान्यही घेत होते. पोटाला पुरेल, स्वच्छ अशी शिवभोजन थाळी ही सर्वांची पहिली पसंत बनली होती. दरम्यान, कोरोना शिरकाव झाल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाले. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद होती. लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. यांचा सर्वात जास्त फटका गरीब-गरजुंना बसला होता. रोजगार नसल्याने आर्थिक संकट ओढावले होते. यामुळे उपासमार वाढली होती. ही उपासमार थांबवण्यासाठी शिवभोजन थाळीचा आधार घेण्यात आला.
जिह्यात 28 केंद्रावर ही शिवभोजन थाळी सुरू आहे. सातारा शहरात एसटी स्टॅड कॅन्टिग, मोती चौक, जिल्हा परिषद कॅन्टिग, तहसिलदार कार्यालय येथील कॅन्टिग या ठिकाणी ही थाळी मिळत आहे. गत वर्षी सुरू झालेल्या या योजनेतून 5 लाख 56 हजार 900 थाळ्या वितरीत करण्यात आल्या. यामुळे कोरोनाच्या काळात ही सरकारची ही योजना प्रभावी ठरली. यामुळे गरीब-गरजुसह सर्वसामान्यांना यांचा मोठा आधार झाला.
10 रूपयांची थाळी 5 रूपयांत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गरीब-गरजुचे हाल सुरू झाले. पुरेसे अन्न मिळत नसल्याने होणारी उपासमार थांबवण्यासाठी कोरोनाच्या काळात सरकाने 10 रूपयांची थाळी 5 रूपयांत देण्यास सुरूवात केली. यामुळे अनेकांचा भूक भागली. तसेच सोशल डिस्टन्सचा फज्जा उडु नये म्हणून ही थाळी पार्सल देण्यात आली.