आमचा हरिदास ऑरेंज झोनमध्ये राहतो. आज न्याहारी फसली होती. बायकोने आज इडल्या केल्या होत्या. सोळा इडल्यांचे इडलीपात्र. नेहमी इडल्या केल्या की त्यातल्या बारा हरिदास खातो आणि उरलेल्या चार बायको खाते. पण आज इडल्या फसल्या होत्या. हरिदासने दोनच इडल्या खाल्ल्या आणि उठला तो थेट आंघोळीला गेला. बायकोला वाटलं, आता हा आंघोळीनंतर नट्टापट्टा करणार आणि काहीतरी निमित्त काढून बाहेर पडणार. रेड झोनमध्ये राहणाऱया त्याच्या बालमैत्रिणीला भेटायला जाणार. तिथं चरून येणार.
आंघोळ करताना हरिदास तारस्वरात जुने गाणे गात होता, ‘नफरत सी हो गयी है, मुहब्बत के नाम से….’ थोडा वेळ आवाज बंद झाला. तो दम खात असणार. रफीचे गाणे एका दमात गाता येत नाही. मग थोडय़ा वेळाने आवाज आला, ‘तेरा भी सामना कभी हो गम की शाम से,’ आणि टॉवेल गुंडाळलेला हरिदास बाहेर आला. आतल्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागला.
आज त्याच्या बायकोने सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं होतं. तो बाहेर आल्याबरोबर तिने त्याची गचांडी धरली आणि म्हणाली, “मला कळतात बरं तुमचे टोमणे. इतकी मला ही समजू नका.’’
“पण मी काय केलं? काय बोललो? इडल्या फसल्या तरी तक्रार न करता आंघोळीला गेलो ना?’’
“आणि गाणं गात होता, नफरत सी हो गयी है… तुम्हाला मी नकोशी झाले आहे.’’
“अगं, तसं नाही. तू का नकोशी होशील? आपले मुख्यमंत्री म्हणतात की नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सुसंवाद आहे. तसा आपल्यात संवाद आहे. मला फक्त आज केलेल्या इडल्यांबद्दल नफरत वाटली. म्हणजे लोकांना कसं सरकारने दिलेलं पॅकेज आवडलेलं नाही, तशी मला इडली आवडली नाही.’’
“तुम्ही बाथरूममधून येताना म्हणालात, तेरा भी सामना कभी हो गम की शाम से.’’
“ते तुला नाही गं म्हणालो, अंग पुसताना मी राजकारणावर विचार करीत होतो. अशा संकटाच्या वेळी राजकारण करणाऱया विरोधी पक्षांना उद्देशून मी ती ओळ गात होतो.’’
“विरोधी पक्ष म्हणजे राज्यातले की केंद्रातले?’’
“कोणतेही समज. मला आता भूक लागलीय. मी वृंदाकडे जाऊ का?’’
“ही काय शपथविधीची वेळ आहे?’’
“तुझं आपलं काहीतरीच.’’