अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : यापुढे विभिन्न प्रकारे जारी करणार : दोन दिवसांत मार्गसूची होणार जारी
प्रतिनिधी / .बेंगळूर
कोरोनावर नियंत्रण येण्याऐवजी रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत असल्यामुळे कर्नाटकात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी ठेवणे अनिवार्य असून त्यात कोणतीही तडजोड करणार नाही. यापुढे लॉकडाऊन विविध प्रकारे असेल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. परिणामी राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. याची मुदत संपत आली असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी येडियुराप्पा यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. केंद्र सरकारकडून दोन दिवसांत लॉकडाऊनविषयी मार्गसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत कोणत्या सेवा उपलब्ध राहतील?, आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होईल, असे स्पष्ट होणार आहे.
लॉकडाऊनचे तीन प्रकारात वर्गीकरण
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लॉकडाऊनचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. यापुढे लॉकडाऊन विविध प्रकारचे असून काही क्षेत्रांना सूट देण्यात येणार आहे. कृषी, उद्योग, कामगारांना अनुकुलता निर्माण करून देण्याबरोबरच सरकारी कार्यालये अंशतः सुरू करण्यासाठी संमती देण्यात येईल. पण रस्त्यावर अनावश्यकपणे फिरणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी 2.84 लाख पीपीई किट आणि दोन दिवसातून एकदा 2 लाख मास्क पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनची चाचणी करण्यासाठी 220 प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. एप्रिलअखेरपर्यंत 300 प्रयोगशाळा सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
मासेमारीला बुधवारपासून प्रारंभ
शेतकऱयांप्रमाणेच मच्छीमारांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून होडय़ा मासेमारीसाठी समुद्रात उतरतील, असे मत्स्योद्योग मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले. कारवार, मंगळूर, उडुपीमध्ये पारंपरिक मच्छीमारीला प्रारंभ होणार आहे. ग्राहकांना घरापोच मासे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मद्यविक्रीविषयी अद्याप साशंकताच
राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आणखी कठोर भूमिका घेणार आहे. आणखी एक-दोन दिवसांत याबाबतची मार्गसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मद्यविक्रीविषयी कोणताही उल्लेख केला नाही. लॉकडाऊन कठोर होणार असल्याने 30 एप्रिलपर्यंत मद्यपेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.
आरोग्य सेतू ऍपची सक्ती
केंद्र सरकारने अनावरण केलेले ‘आरोग्य सेतू’ ऍप सर्वांनी सक्तीने वापरावे, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. कोरोनाबाबत सर्वांना योग्य माहिती असणे अगत्याचे आहे. या उद्देशाने आरोग्य सेतू ऍप उपयुक्त आहे. त्यामुळे जनतेने, सरकारी कर्मचारी, स्वयंसेवकांनी हे ऍप डाऊनलोड करून घ्यावे, असा आदेश राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी दिला आहे. ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येणाऱया रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी हे ऍप उपयुक्त आहे. जीपीएसद्वारे हे ऍप काम करते. शिवाय रुग्ण आपल्याजवळ वावरत असल्यास मोबाईलवर सतर्कतेचा संदेश मिळेल.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे –
@ लॉकडाऊन कोणत्याही कारणास्तव शिथिल करणार नाही
@ वैद्यकीय कर्मचाऱयांशी अनुचित वर्तन केल्यास कठोर कारवाई
@ कृषी उत्पादन वाहतूक होणारी वाहने टोलवर अडवू नयेत
@ मत्स्योद्योग-प्रक्रियेला लॉकडाऊनपासून सूट