पाथरवट समाज-राजस्थानहून आलेल्या कारागिरांचे किल्ला परिसरात बस्तान : वर्षानुवर्षे याच व्यवसायावर चालतो चरितार्थ
प्रतिनिधी / बेळगाव
क्रिकेट खेळण्यासाठी बॅट, स्वयंपाक घरात आवश्यक असलेले जाते, उखळ, खलबत्ता, विविध प्रकारच्या मूर्ती असे विविध साहित्य तयार करून विक्री करणाऱया कामगारांची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. किल्ला तलावानजीक फेरफटका मारला असता पाथरवट समाजाचे हे लोक आपल्याला पाहायला मिळतात.
यातील पाथरवट समाज हा निपाणीहून बेळगावला स्थलांतरित झाला आहे. तर मूर्तिकार राजस्थानहून आलेले आहेत. तलावाच्या समोर फूटपाथनजीक हे साहित्य विक्रीसाठी घेऊन ते बसलेले आहेत. याच जागेच्या मागील बाजूस झोपडीमध्ये त्यांचा संसार चालतो.
एकूण 30 हून अधिक कुटुंबे असून साधारण 200 ते 250 इतकी त्यांची संख्या आहे. चिकोडी आणि कोल्हापूर येथून ट्रकने ते दगड आणतात आणि त्यातून उखळ, खलबत्ता, जाते, पाटा, वरवंटा असे साहित्य तयार करतात. दगड फोडणे हे काही सोपे काम नव्हे. परंतु वर्षानुवर्षे आम्ही ते करत आलो आहोत. त्यावर आमचा चरितार्थ चालतो, असे सोनाबाई या आजींनी सांगितले.
पूर्वी या साहित्याचा दर कमी होता. परंतु आज खलबत्ता 300 रुपये, जाते 1200 ते 1500 पर्यंत, उखळ 800 असा दर आहे. अर्थात घासाघीस करण्यास बराच वाव आहे. मिक्सर आल्यानंतर खरे तर या वस्तू कोण घेतील, असे आपल्याला वाटू शकते. परंतु ग्रामीण भागात आजही या वस्तुंचा वापर होतो. तर शहरामध्ये घराच्या आधुनिकीकरणामध्ये ऍन्टीक पीस म्हणून या वस्तू ठेवल्या जातात.
कोरोनामुळे सध्या खरेदी थंडावली आहे. हायवेवरून जाताना एखाद दुसरे ग्राहक या वस्तू खरेदी करते. त्याच पैशावर त्यांचे दोन दिवस पोट चालते. सरकारी नळावरून पाणी आणायचे, आडोसा तयार केलेल्या ठिकाणी आंघोळ करायची, दगड विटांची चूल मांडून स्वयंपाक करायचा, असा त्यांचा दिनक्रम
आहे.
याचठिकाणी राजस्थानहून आलेले कारागीर प्लास्टर ऑफ पॅरिसमधून विविध मूर्ती घडवितात. शिवाजी महाराज हे त्यांचे सर्वांचेच दैवज्ञ आहे. अर्थातच महाराजांच्या मूर्ती अधिक प्रमाणात आहेत. याशिवाय हत्ती, घोडे, उंट व अन्य तऱहेच्या मूर्ती तयार करत असल्याचे पूरिया राठोड यांनी सांगितले.
दोन्ही समाजातील मुले शिक्षणापासून वंचित
कोरोना काळामुळे त्यांचा व्यवसाय थंडावला आहे. परंतु विविध स्वयंसेवी संस्था अन्नदान करत असल्यामुळे सध्या तरी त्यांची भूक भागते आहे. दुर्दैवाने या दोन्ही समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यापैकी फक्त एक मुलगी शाळेला जात आहे. कोरोना संपेल आणि पुन्हा आपल्या व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशा आशेत ही मंडळी आहे.