ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. तरी देखील राज्यातील सर्व धर्मियांनी प्रचंड संयम दाखवला. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. मात्र, दोन पोलिसांचा या लढाईत मृत्यू झाला, याचे दुःख आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळहळ व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. उद्धव म्हणाले, आता रमजानचा महिना आहे. त्यामुळे घरात राहूनच मुस्लिम बांधवांनी नमाज पढावेत. देव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफारी कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत. दुर्दैवाने दोन पोलीस योध्यानचा या लढाईत मृत्यू झाला त्याचे दुःख आहे.
दरम्यान, संकटकाळात राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिला आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. राजकारण टाळून आपण सर्वजण कोरोनाची लढाई लढत आहोत. तरी देखील जे राजकारण करत आहेत, त्यांना करूद्या.