छपरांची कामे कधी होणार? :पाऊस तोंडावर आल्याने शेतकरी विवंचनेत
प्रतिनिधी / कुडाळ:
पाऊस अवघ्या महिन्यावर आला असून संचारबंदी व लॉकडाऊनमुळे घरांची बांधकामे तसेच छपराची कामे अपूर्ण राहिली आहेत.
घरे बांधणारे शेतकरी तेथेच झोपडय़ा तसेच मंडप बांधून राहत आहेत. घरांची छप्परे तसेच स्लॅबच्या कामांना परवानगी न दिल्यास पावसाळय़ात आपले काय होणार, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्राधान्याने घरांची छप्परे करणे तसेच घरांच्या बांधकामांना परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एप्रिल महिना संपत आला असून मेच्या पंधरा तारीखनंतर केव्हाही पाऊस येण्याची शक्यता आहे. जिल्हय़ातील विशेषत: ग्रामीण भागातील शेतकऱयांनी आपल्या जुन्या घरांच्या छपरांची दुरुस्तीची कामे हाती घेतली होती आणि त्याच दरम्यान कोरोनाचे संकट पुढे आले. त्यानंतर पुकारलेली संचारबंदी व लॉकडाऊनमुळे छपरांची कामे रखडली आहेत. छपरांसाठी लाकूड सामान आणणे अशक्य झाले, तर सुतार मंडळीही कामावर येत नाहीत. घरांची दुरुस्ती करणारे शेतकरी मंडपात वा तात्पुरत्या झोपडीत राहत आहेत. अचानक पाऊस आल्यास त्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
स्लॅबच्या घरांचे कामही अर्धवट
ग्रामीण भागासह शहरातही अनेकांनी जुन्या घरांच्या जागी स्लॅबची घरे बांधण्यास घेतली. मात्र, संचारबंदी व लॉकडाऊनमुळे चिरे, खडी, वाळू आणता येत नाही. तसेच गवंडीही काम करू शकत नाहीत. काहीजणांकडे साहित्य होते. मात्र, संचारबंदीचा भंग होतो, यासाठी पोलिसांनी घरांचे बांधकाम बंद पाडल्याच्या तक्रारी येत आहेत. ही घरांची बांधकामे पूर्ण होणे आवश्यक आहे. कामे अपूर्ण असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.