गोव्यात पुन्हा येण्यासाठी चाललीय धडपड
प्रतिनिधी / मडगाव
विविध कामांसाठी अनेक गोवेकर हे शेजारील महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यात गेले होते तर काही जण वैद्यकीय उपचारासाठी इतर राज्यांनी गेले होते. लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडले आहेत. आत्ता लॉकडाऊन 3 मे पर्यंत असल्याने त्यांची परत येण्यासाठी धडपड सुरू झालीय. पण, त्यांना सरकारकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही.
मडगावातील श्यामसुंदर लोटलीकर हे महाराष्ट्रात अडकले आहे तर श्री. तेलगू हे चेन्नईत अडकले आहेत. या दोघांची पुन्हा गोव्यात येण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यात श्यामसुंदर लोटलीकर यांनी फेसबुकच्या माध्यमांतून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे व गोव्यात परत येण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. तर श्री. तेलगू हे आपल्या मुलाच्या उपचारासाठी चेन्नईला गेले होते. त्यांना परत गोव्यात यायचे आहे व तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. शेजारील राज्यातून केवळ जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारी वाहनेच सोडली जातात. प्रवाशांना आत येऊ दिले जात नाही. त्यामुळे अनेक गोवेकर अशाच पद्धतीने शेजारील राज्यांनी अडकले आहेत.
श्यामसुंदर लोटलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण व आपली पत्नी 7 मार्चपासून महाराष्ट्रात अडकलो आहोत. आम्ही आता ठाणे जिह्यातील अंबरनाथ, मध्ये राहात आहोत. संचार बंदीच्या दुसऱया दिवशी आम्ही गोव्यात येण्याचा जाण्याचा विचार केला होता. पण, संचारबंदी 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.
आता पुन्हा हे लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आले. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील ‘कोविड’ परिस्थिती पाहिल्यास मे किंवा जूनपर्यंत कोविड आणखीन वाढू शकतो. त्यामुळे लवकर गोव्यात येणे आवश्यक बनले आहे.
लोक परदेशातून भारतीयांना आणतात तेव्हा लोकल ट्रान्सफरच्या समस्येवर लक्ष देण्याची यंत्रणा का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बातम्या तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वार गोवा सरकारने बाहेरील राज्यांत अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी केलेले प्रयत्न आम्ही पाहिले आहेत. आम्ही घरी परत येण्यास उत्सुक आहोत. आम्ही घराबाहेर असल्याने आमचा खर्च वाढला आहे.
गोव्यात जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण, आम्ही मानवी कनेक्शनशिवाय खासगी वाहनात येऊ. आणि नंतर आमच्या ‘मडगाव निवासस्थानावर’ नियमानुसार क्वॉरंटाईन करू. सरकार या प्रकरणात का पहात नाही ? लोक सुरक्षितपणे त्यांच्या स्वतःच्या घरात राहू शकतात. परंतु दूर राहून ते तणावग्रस्त राहतात आणि खर्चही जास्त होतो. दबाव वाढत आहे. ताण जास्त आहे. शासनाचे सहकार्य नाही. आता कोण मदत करेल ? गोवा सरकार आमची सुटका करुन गोव्यात आमच्या घरी परत आणू शकेल काय ? आम्ही आमच्या प्रिय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा करतो.
फेसबुकवरील या पत्रानंतर अनेकांनी त्यांना गोव्यात परत येण्यासंदर्भात विविध सूचना केल्या आहेत. तर कोणी महाराष्ट्रात जिथे आहात तिथे मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. पण, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस झपाटय़ाने वाढत असल्याने श्री. लोटलीकर यांनी पुन्हा गोव्यात येण्याची तयारी दर्शविली आहे. पण, काल उशिरापर्यंत त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता.
श्री. तेलगू हे चेन्नईत अडकले आहेत. त्यांना गोव्यात येण्यासाठी अगोदर चेन्नई व नंतर कर्नाटक सरकारने मान्यता द्यायला हवी. मुलावरील वैद्यकीय उपचारासाठी गेलेल्या श्री. तेलगू यांनाही खर्चाचा ताण येऊ लागला आहे. सरकारने त्यांना ही मदत करणे आवश्यक बनले आहे.