खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सणांवर निर्बंध आले आहेत. त्यातच अवघ्या एक-दोन दिवसांवर शिवजयंती, अक्षय तृतीया, बसव जयंती, रमजान ईद, हे तिन्ही सण उत्सव आले आहेत. मात्र सोमवार दि. 10 पासून कडक लॉकडाऊन लागू झाल्यामुळे हे सण-उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार आहेत.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे. या दिवशी काही तरी वस्तू खरेदी केली जाते. त्यामुळे या मुहूर्तावर सोने-चांदीसह प्लॉट, घरे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. सुवर्ण खरेदीला या दिवशी वेगळे महत्व असल्याने मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी होते. यातून दरवर्षी कोटय़वधीची उलाढाल सुवर्ण बाजारात होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने खानापूरची संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. साडेतीन मुहूर्तामधील पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडवा सणही गतवर्षी लॉकडाऊनमध्ये वाया गेला होता. यंदा मात्र हा सण साजरा करण्यात आला. आता अक्षय तृतीयेचा मुहूर्तही वाया जाणार असून या दिवशी होणारी कोटय़ावधीची उलाढाल ठप्प राहणार आहे.
अक्षय तृतीयेला किमान सोने खरेदी करावी म्हणून काही हक्काचे ग्राहक त्यांच्या नेहमीच्या सुवर्ण पेढीच्या संपर्कात आहेत. ओळखीच्या दुकानाशी संपर्क साधून थोडे तरी सोने उपलब्ध करुन द्या, अशी विनंती ग्राहक करीत आहेत. मात्र हा व्यवहार शक्यच नसल्याने व्यवसायिकांकडून त्यांना नकार दिला जात आहे. तसेच खानापूर शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवही मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. शिवजन्म सोहळय़ाबरोबरच खानापूर शहरात शिव जयंतीची भव्य मिरवणूक काढली जाते. पण कोरोना निर्बंधामुळे यावर्षी देखील शिवजयंती उत्सव अत्यंत साधेपणानेच साजरा केला जाणार आहे. अशीच परिस्थिती बसव जयंतीची देखील आहे. मुस्लीम बांधवाकडून गेल्या महिन्याभरापासून रोजा पाळण्यात आला आहे. 14 मो रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईदच्या आठ दिवस अगोदर बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मुस्लीम बांधवाकडून कपडे खरेदी करण्याबरोबर इतर खरेदीही केली जाते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या सणावर निर्बंध आले आहेत. यामुळे मुस्लीम धर्मीयांना देखील यावर्षीचा रमजान ईदही अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे.