गेले दोन-अडीच महिने ज्याच्या संगतीत काढले, ज्याने आपल्याला कोरोनापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, तो लॉकडाऊन आपली निरोप घ्यायची तयारी करतो आहे.
भाजी मंडई सुरू झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले आहे. रोज घरी दुधाचा रतीब घालणारे आणि वर्तमानपत्रे टाकणारे गेले कित्येक दिवस दिसले नव्हते. आता कदाचित ते दिसतील.
पण लॉकडाऊन बंद होण्याच्या उंबरठय़ावर काही जुन्या गोष्टी परत भेटीला आल्या. रोज काही ठरावीक तास लॉकडाऊन शिथिल असे. त्या काळात भाजीवाले रस्त्यावरून ओरडत जात. डोक्मयावर भाजीची टोपली घेऊन दारावर येणाऱया आज्या खूप दिवसांनी दिसल्या. तसेच ‘दूध घ्यायचं का दूध?’ अशी आरोळी देत ‘चित्तळे, गोक्कूळ, कात्तरज… गाय-म्हैस दूध…’ असं ओरडत जाणारे देखील दिसले. चितळे, गोकुळ किंवा कात्रजवाल्यांनी आपल्या दुधाची अशी जाहिरात कधी केली नसेल, ती या विपेत्यांनी केली. हायटेक भाजीवाल्यांनी आपापल्या गल्लीत व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि ग्राहकांना रोज ताज्या भाज्यांचे दर कळवू लागले. ऑर्डर दिली की त्यांचा माणूस घरी येऊन भाजी द्यायचा म्हणे.
लॉकडाऊनमध्ये घरी बसून वजने वाढली. चमचमीत खायला न मिळता देखील पोटे फुगली. बायकोने खूप राब राब राबून कितीही चांगला पदार्थ केला तरी त्याला नाक मुरडणे, किंवा ‘हा पदार्थ माझी आई छान करायची, तिच्या हाताला काही वेगळीच चव होती’ अशी शेरेबाजी करून बायकोला निरुत्साही करणे वगैरे सवयी नवरे लोकांनी सोडल्या. पानात येईल ते निमूट खाऊ लागले. तर्रीयुक्त रस्सा-पाव, पाणीपुरी, मिसळ, वडा-पाव यांचे ओबडधोबड घरगुती पर्याय लोकांनी रुचकर मानून घेतले.
सुरुवातीच्या काळात चेहऱयावर मास्क ऊर्फ मुखपट्टी लावून घराबाहेर पडताना समोरून ओळखीची व्यक्ती आली आणि तिने स्मितहास्य केले तरी पटकन लक्षात येत नसे, ओळख पटत नसे. आता सवयीने मास्कच्या आरपार बघता येऊ लागले. चेहरे ओळखता येऊ लागले. लॉकडाऊन पूर्ण उठेल तेव्हा कदाचित मास्कविरहित चेहऱयाने जिवलग मित्र-मैत्रिण समोर आल्यावर पटकन ओळखू येणार नाहीत!
लॉकडाऊन त्रासदायक होता. पण केव्हा तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळेल. नंतर आणखीन काही दिवस जातील, तेव्हा त्यातल्या कटू आठवणी सरलेल्या असतील आणि रोमहर्षक गमती आठवत राहतील.