मुंबई / ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग रोखण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक संपली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अस्लम शेख, एकनाथ शिंदे या नेत्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊनसंबंधी चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच लॉकडाऊनची घोषणा उद्या मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासोबतच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्यात येत्या काही तासात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले.
राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत लॉकडाऊनबाबत माहिती देणार असल्याची माहिती या मंत्र्यांनी दिली आहे.
काही तासांत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा लागेल – अस्लम शेख
मुंबईची पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, राज्यात निर्बंध लागू केले तरी रुग्ण कमी होत नाहीयेत. त्यामुळे काही तासांत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा लागेल- असे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय -जितेंद्र आव्हाड
गृनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लसीकरणारचा वेग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशामध्ये उत्पादित होत असलेल्या प्रत्येक लसीला महाराष्ट्रात आणण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली जाणार आहे.
कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना – एकनाथ शिंदे
लॉकडाऊन अत्यंत कडक असला पाहिजे. गेल्यावर्षी जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तसाच हा लॉकडाऊन हवा. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन आवडीचा विषय नाही मात्र लॉकडाऊनशिवाय आज पर्याय देखील नाही. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दहावीच्या परीक्षा रद्द- राजेश टोपे
राजेश टोपे म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊनचा आग्रह धऱला आहे. जे गोरगरीब लोक असतात. त्यांच्यावर ज्या अडचणी येतील त्यांच्यावर कसा अन्याय होणार नाही, त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. आपल्याला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांट लवकरात लवकर जनरेट करावा याची मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. यासोबतच त्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली.