नागरिकांची गर्दी झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील आणि बाजारपेठेतील गर्दी टाळण्याबरोबरच कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना करण्याकरिता महापालिकेने पथकांची नियुक्ती केली आहे. भाजीमार्केट, फळमार्केट आणि फूलमार्केट अशा विविध ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांचा समावेश असलेल्या पाच पथकांची नियुक्ती शुक्रवारपासून केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनाने विविध नियमावली घालून दिल्या असून याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला दिली आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी तसेच फळमार्केट, फूलमार्केट, भाजीमार्केट व अन्य ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱयांच्या पथकांची नियुक्ती करण्याची सूचना केली होती.
यानुसार महापालिकेने एपीएमसी मार्केटयार्ड, एपीएमसी भाजीमार्केट, नव्याने झालेले जय किसान होलसेल भाजीमार्केट, अशोकनगर येथील फूलमार्केट, न्यू गांधीनगर येथील प्रुट मार्केट अशा ठिकाणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन कालावधीत नियमावलींचे उल्लंघन करणाऱया नागरिकांवर व व्यापाऱयांवर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील विविध मार्केटवर मनपाच्या पथकांची नजर राहणार आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांची गर्दी झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक व नागरिकांनी कोरोना नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.