बेळगावसह 11 जिल्हय़ांमधील निर्बंध कायम
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात जारी करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवार दि. 14 जूनपासून शिथिल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱया 19 जिल्हय़ांमध्येच अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. संसर्ग अधिक असणाऱया उर्वरित 11 जिल्हय़ांमध्ये मात्र लॉकडाऊन 21 जूनपर्यंत जारी राहणार आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी अनलॉकसंबंधीची मार्गसूची जारी केली असून त्यामध्ये विविध क्षेत्रांना सूट दिली आहे. तथापि, नाईट कर्फ्यू आणि दोन दिवसांचा विकेंड कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी लॉकडाऊन, अनलॉकसंबंधीची मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार बेळगाव, चिक्कमंगळूर, चामराजनगर, दावणगेरे, शिमोगा, मंगळूर, बेंगळूर ग्रामीण, हासन, म्हैसूर, कोडगू आणि मंडय़ा या जिल्हय़ांमध्ये 21 जून रोजी सकाळी 6 पर्यंत यापूर्वीप्रमाणेच कडक नियम जारी राहणार असून येथे कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. उर्वरित अनलॉकची घोषणा झालेल्या जिल्हय़ांमध्ये सर्व कारखाने 50 टक्के कर्मचाऱयांच्या तर गारमेंट्स कंपन्या 30 टक्के कर्मचाऱयांच्या क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 6 ते 10 पर्यंत असणारी वेळ लॉकडाऊन असणाऱया जिल्हय़ांमध्ये यापूर्वीप्रमाणेच निर्धारित करण्यात आली आहे तर अनलॉक असणाऱया जिल्हय़ांमध्ये त्यासाठी दुपारी 2 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. या कालावधीत मद्य दुकाने, दूध, मांसविक्री, किराणा दुकाने, हॉटेलही सुरू राहणार असून केवळ पार्सल नेण्याची परवानगी असणार आहे. बांधकामांना परवानगी देण्यात आली असून बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व दुकाने सुरू ठेवता येतील. उद्याने सकाळी 5 ते 10 या कालावधीत सुरू राहणार असली तरी कोविड मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ऑटो रिक्षा, टॅक्सी सुरू राहणार असून एकावेळी केवळ दोघांनाच प्रवास करता येणार आहे.