दक्षिण ऑस्ट्रेलियातील आरोग्य अधिकाऱयांचे मत
ऍडलेड / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 चे महासंकट थोपवण्यासाठी दक्षिण ऑस्ट्रेलियात 6 दिवसांचे लॉकडाऊन भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना होण्याच्या दृष्टीने पथ्यावरच पडेल, असा दावा दक्षिण ऑस्ट्रेलियातील आरोग्य अधिकाऱयाने केला आहे. अर्थात, याचवेळी सामना होईलच, याची खात्री देता येणार नाही, असा पवित्राही निकोला यांनी घेतला. ऍडलेड येथे दि. 17 डिसेंबरपासून दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, कोव्हिड-19 उग्र स्वरुप धारण करत असल्याने अनिश्चिततेचे सावटही आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलियाने कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्या सर्व सीमारेषा बंद केल्या आहेत आणि बाहेरील प्रांतातून येणाऱया व्यक्तींवर प्रवेशबंदी आहे. सर्व सीमारेषा बंद केल्यानेच कसोटी कर्णधार टीम पेनसह काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना हवाईमार्गे न्यू साऊथ वेल्सला नेण्यात आले. या पार्श्वभूमीवर दक्षिण ऑस्ट्रेलियाचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी निकोला स्परियर बोलत होत्या.
‘मला खात्रीने सांगता येणार नाही. कारण, सारे चित्र पारदर्शक अजिबात नाही. पण, तूर्तास, सामना पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे खेळवला जावा, यासाठीच आम्ही सारे जण प्रयत्न करत आहोत’, असे त्या पुढे म्हणाल्या. ‘लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असणार आहे. सारे काही पूर्वपदावर येण्यासाठी निश्चितच वेळ लागेल. साहजिकच, सामना होऊ शकला तर चाहत्यांना घरबसल्या त्याचा आस्वाद घेता येईल. बाहेरील बंधने पाळावीच लागतील. पण, टीव्हीवरुन थेट प्रक्षेपण त्यांना पाहता येईल’, याचाही त्यांनी पुढे उल्लेख केला.
कसोटी मालिकेपूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाचे संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमनेसामने भिडणार असून ही मालिका दि. 27 नोव्हेंबर रोजी सुरु होईल. यात 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार आहेत.