राज्यातील नामवंत डॉक्टरांचे मत, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन हवा
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोविड-19 च्या फैलाव होऊ नये असे वाटत असेल तर त्वरित लॉकडाऊनचा कालावधी किमान 30 एप्रिलपर्यंत वाढवावा व जनेतला जूनपर्यंत कोणतेही एकत्रित काम करण्यास देऊ नये, अशी मागणी राज्यातील नामवंत डॉक्टर्सनी केली आहे.
जपानसारखी स्थिती नको
गोवा वैद्यकीय संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, राज्यातील कोविड-19 बऱयापैकी नियंत्रणात आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केला म्हणून हे शक्य आहे. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविल्यास जपानमध्ये जी आज परिस्थिती आहे तशी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. अगोदर लॉकडाऊनबाबत जनतेची मानसिक तयारी नव्हती. आज ती तयार झालीय. तेव्हा लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत तरी वाढवावाच, असे डॉ. साळकर म्हणाले.
डॉ. जयंत भंडारे यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन कालावधी हा जनतेच्या भल्यासाठी आहे. सरकारने जनतेच्या दबावाखाली येऊ नये आणि लॉकडाऊन मागे घेऊ नये, तसे केल्यास आजवर जे काही प्रयत्न केले ते सर्व वाया जातील. डॉ. भंडारे म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंदच ठेवण्यात यावी. लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवावा. त्यानंतर कोणता व कसा परिणाम झाला याचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा. मार्केट खुले करू नका आणि खासकरून मासळी मार्केट खुले करू नका, असे डॉ. भंडारे यांनी सूचित केले.
कालावधी वाढविणे यातच जनतेचे हित ः डॉ. साखरदांडे
ग्रामीण भागात खेडोपाडी जाऊन जनतेची अनेक वर्षे सेवा बजावलेले निवृत्त आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र साखरदांडे यांनी सध्याचा लॉकडाऊन कालावधी वाढविला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली. आता गोव्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे. याचा अर्थ गोव्यातून कोविड-19 हद्दपार झाला असे म्हणता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन कालावधी वाढवावा. मोठय़ा प्रमाणात जनता बाजारात जाण्याच्या निमित्ताने फिरते. हा प्रकार बरोबर नाही. सरकारने 30 एप्रिलपर्यंत कालावधी वाढवावाच. शिवाय जनतेला अत्यावश्यक जीवनाश्यक सामान मिळेल यासाठी प्रयत्न करावा, आणि जनतेनेही याकामी आणखी 15 दिवस कळ सोसावी. तसे करण्यात प्रत्येकाचे स्वतःचे व राज्यातील जनतेचे हित आहे, असे डॉ. राजेंद्र साखरदांडे म्हणाले.